गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

मन

माणसांप्रमाणे वागा सारे काही मनावर आहे; मनातील शक्तीवर आहे। बाह्य जगाला आपणच शक्ती देत असतो. शक्तीचा साठा आपल्या मनात आहे. बाहेरच्या जगाने कितीही ऐट मारली तरी ती पोकळ आहे. बाह्य जग हे आपल्या मनाचे खेळणे आहे. आपल्या मनातील विचारांचेच बाह्य जग हे प्रतिबिंब आहे. “आपली आजची जी स्थिती आहे, ती आपल्या विचारांचे फळ आहे, आपल्या चिंतनाचा तो परिणाम आहे.” “विचार आपणांस आकार देत असतात, रंगरूप देत असतात. जीवनाची सारी इमारत मनातील विचारांवर उभारलेली असते.”असे आहे म्हणूनच जीवनात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे. आपले मन कार्य करण्यास सदैव सज्ज असले पाहिजे. जे काम करावयाचे असेल ते छोटे असो वा मोठे असो; केव्हाही मन इच्छाशक्तीच्या हुकमतीखाली राहिले पाहिजे व त्याला हाक मारताच त्या त्या कर्मात रंगले पाहिजे। कोणताही प्रश्न असो, त्यात खोल दृष्टी पोचवण्यास मन समर्थ पाहिजे. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मनाला नीट देता आले पाहिजे. मन दुबळे होऊन मात्र चालणार नाही. पोटाची उपासमार झाली तरी होऊ दे., परंतु मनाची होता कामा नये. शरीर दुबळे झाले तरी होवो, परंतु मन खंबीर राहो. योग्य व तेजस्वी शिक्षण मिळालेच पाहिजे. मनाला भरपूर खाद्य, पोटभर भाकरी मिळालीच पाहिजे.तुम्ही कोणता विषय शिकता, ही गोष्ट महत्त्वाची नाही. प्रश्न आहे तो मनाचा आहे. जो विषय अभ्यासिलात, त्या विषयाच्या अध्ययनाने मनाला कोणते सामर्थ्य मिळाले, किती शक्ती मिळाली, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बाहेरचे तंत्र, बाहेरची कवाईत काहीही असो; बौध्दिक सामर्थ्य त्यामुळे नीट पुष्ट झाले पाहिजे. दोन मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत. 
(१) ज्या विशिष्ट साधनांचा आपण उपयोग करू ती साधने. 
(२) ज्या मानसिक शक्तीने आपण ती ती साधने, ते ते विषय पकडतो त्या मानसिक शक्तीचे शिक्षण. तरवारीचा परिचय असणे हे नि:संशय चांगले आहे; परंतु बाहूंत सामर्थ्य असणे ही त्याहून महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही संस्कृत शिका की इंग्रजी शिका; काव्य शिका किंवा इतिहास शिका; शास्त्र शिका किंवा धंदेशिक्षण घ्या; ह्या निरनिराळ्या साधनांनी मन तयार होत असते. हे निरनिराळे खेळ खेळून मनाची शक्ती कमवायची असते. आपणांस शक्ती पाहिजे आहे. विचाराची शक्ती, एकाग्रतेची शक्ती. एकाग्रतेच्या अभ्यासाने विचारशक्तीच मिळत असते. आपणास कधी काळी जर समाधीचा अनुभव आला, तर तिचाही हाच अर्थ आहे, असे कळून येईल. प्रार्थना, पूजा, जपजाप्य, पुनश्चरणे- सर्व साधनांचा हाच एक हेतू असे. मनाला ताब्यात ठेवण्याची पराकाष्ठेची निग्रहशक्ती मिळविणे हाच हेतू असे. उद्योग चालू दे, अभ्यास सुरू असू दे. यत्नदेवो भव. ढिलाई नको. शिथिलता नको. असे करीत राहिलेत म्हणजे गेलेले स्वत्व एक दिवस तुम्ही मिळवून घ्याल. वेळ काही अजून गेली नाही. आपण आपली श्रेष्ठता प्रकट केली पाहिजे. तिचा कोंडमारा करता कामा नये. आपण आपल्या श्रेष्ठतेचे समर्थन केले पाहिजे. आत्मसंयमन करा व नीट ध्येय पाहून पुढे चला. स्वत:ला गती द्या. प्रत्येक साधनाचा उपयोग करा. कोणताही उपाय वगळू नका. प्रयत्नांची शर्थ करा, जिवाचे रान करा, रक्ताचे पाणी करा, ह्या जागतिक स्पर्धेत, प्रत्येक गोष्टीत पुढे या, प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला चीत करीन, मागे टाकीन, अशी हिंमत बाळगून पुढे या. अर्वाचीन शास्त्रीय ज्ञान - ते इतरांच्या इतकेच आपलेही आहे- करा तर ते आपलेसे. सत्याचा शोध नाना रूपांनी करावयास आपणही सुसज्ज झाले पाहिजे; आपल्यासाठी भाग्य उभे आहे, मानसन्मान उभे आहेत। नवीन नवीन अपरिचित अशाही कर्मक्षेत्रांत व ज्ञानक्षेत्रांत घुसून तेथेही पूजार्ह आपण होऊ या. सामुदायिक जाणीव, सामुदायिक सामाजिक व्यक्तित्व होय, ह्या गोष्टीही आपल्याजवळ आहेत. सारे काही आपणाजवळ आहे. फक्त नवीन कार्यक्षेत्रात नवीन रूपाने त्यांचा आविष्कार करावयाचा आहे एवढेच. सामाजिक कार्य करण्याची आवड, त्यागाची वृत्ती- यांना आपण काही पारखे नाही.वरच्या शब्दांनी दिग्दर्शित झालेले ध्येय गाठण्यासाठी, सर्वांगीण शिक्षणासाठी आपण अहोरात्र धडपडले पाहिजे. कोंडलेला मनुष्य शुध्द हवेसाठी, दुष्काळात सापडलेला अन्नासाठी, तहानलेला पाण्यासाठी, त्याप्रमाणे आपण नवीन ज्ञानासाठी, नवीन अनुभवासाठी आतुर व उत्कंठित झाले पाहिजे. जागतिक स्पर्धेत नीट टक्कर देता यावी म्हणून सर्व साधने प्रथम हस्तगत करून घेऊ या. आणि मग अर्वाचीन सुधारणेच्या सर्व कसोटयांचा प्रकाश जरी आपल्यावर सोडण्यात आला, तरी आपण दिपावून जाणार नाही. हे अर्वाचीन संस्कृती ! 

त्यागवृत्ती समाजात निरनिराळ्या विशिष्ट भलभलत्याच चुकीच्या कल्पना व भलभलतेच विचार रूढ होत असतात. त्या त्या काळात अशा भ्रामक कल्पना आपणास नेहमी दिसून येतील. आजच्या काळातील लोकांचीही अशीच एक चुकीची दृष्टी बनली आहे. आज कोणाला काहीही करावयास सांगा, एखादे नवीन तत्त्व सांगा, एखादा नवीन विचार सांगा, एखादे नवीन स्वदेशीचे व्रत, एखादा नवीन आचार सांगा, - की लगेच ते विचारतील, “यापासून लभ्यांश कोणता ? आमचा फायदा काय होईल ? किती होईल ?” स्वत:चा फायदा हेच व्यक्तीचे नेहमी उद्दिष्ट दिसून येत असते. अमक्या अमक्या तर्‍हेने वागल्यास, काही ठराविक मुदतीत तुमचा अमुक फायदा होईल, असे सांगितले तर लगेच तसे करावयास माणसे तयार होतात. फायदा होणार असेल तरच करणे योग्य, नाहीतर अयोग्य - असे आजचे योग्यायोग्यतेचे बाजारी माप आहे.व्यक्ती या शब्दांतील अर्थ विशाल असेल तर हरकत नाही. ‘आमचा फायदा काय,’ असे विचारताना, ‘आमचा’ हा जो शब्द त्यात सर्व समाज, सारे राष्ट्र येत असेल, तर हरकत नाही. ‘फायदा’ हा जो शब्द त्याचा अर्थही विशाल असेल, केवळ चार दिडक्या एवढाच नसेल तरीही हरकत नाही. परंतु असा विशाल अर्थ घेण्यास मनुष्य तयार नसतो. अशी ही विशाल दृष्टीच कोणाला मुळी नसते. ‘चांगले कर’ असे सांगताच, फायदा काय असे विचारतात. परंतु स्वत: वाटेल तसे रोज वागतात, त्या वेळेसही ‘असे केल्याने फायदा काय,’ असे जर स्वत:ला विचारतील तर किती छान होईल मानवी ज्ञानात जी जी मौल्यवान् भर पडली, जो जो प्रत्येक नवीन शोध लागला, नवीन शोध मिळाला, त्या सर्वांच्या मुळाशी त्याग आहे। जे जे नवीन तत्त्व सापडले, जी जी नवीन सिध्दी मिळाली, त्या सर्वांच्या मुळाशी यज्ञ आहे. मानवजातीचा इतिहास ही गोष्ट निरपवाद शतमुखांनी सांगत आहे. “त्यागेन एकेक अमृतत्वमानशु ।” ज्यांनी ज्यांनी स्वत:च्या स्वार्थावर पाणी सोडले, मानवजातीच्या कल्याणासाठी अहोरात्र अखंड श्रम करण्यातच ज्यांनी जीवनाची सफलता मानली, अशा व्यक्तींकडूनच ज्ञान संवर्धिले गेले, सत्य प्रकट केले गेले. भारतवर्षात आपण असे चटकन् म्हणायचा संभव आहे, की त्याग फक्त संन्याशाने करावा !परंतु प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कार्यात संन्याशी लागत असतात, ही नवीन गोष्ट आज आपणास शिकावयाची आहे. समाजाच्या नानविध क्षेत्रांत संन्यास आज वावरू लागला पाहिजे; त्याची सर्वत्र जरूरी आहे. ज्या कामात संन्यास नाही, ज्या वर्गात संन्यास नाही, तेथे तेज चढत नाही। कोणतेही हाती घेतलेले कार्य हे नेहमीच आरंभापासूनच फायदेशीर होऊ लागते असे नाही। फारच थोड्या गोष्टी अथपासून इतिपर्यंत पैसे देणार्‍या असतात- फायदा करून देणार्‍या असतात. उदाहरणार्थ, समाजाच्या हिताच्या दृष्टीने शिक्षणाइतके महत्त्वाचे दुसरे काही नाही. ज्या चळवळीत त्याग नाही, ज्या चळवळीच्या मुळाशी त्यागाची आध्यात्मिक शक्ती नाही, ज्या चळवळीत संन्याशाचे धगधगीत तेज नाही; त्या चळवळीची कोणासही भीती वाटावयास नको। परंतु त्यागावर उभारलेली चळवळ, फकिरांनी चालविलेली चळवळ ही विश्वाला गदागदा हलवील. या अशा संन्याशाच्या मनात समाजाच्या हिताची व कल्याणाची कल्पना सदैव जागृत असते. ज्या ज्या वेळेस नवीन संबंधाचे नवीन स्वरूप दाखवले जाते, त्या त्या वेळेस नवीन युगाचा उदय होत असतो, नवती मनूचा आरंभ होत असतो। “ज्याला भय नाही व इच्छा नाही असा जो निरिच्छ, नि:स्पृह, निर्भय पुरुष, तोच संन्यासी.” संन्याशाच्या वेशाने नटलेला, गेरूचा रंग दिलेला, भगवा पोषाख केलेला नव्हे; तर अंतरी त्यागाने रंगलेला संन्यासी वेषाचा नव्हे, तर संन्यस्तवृत्तीचा. ज्याला भय नाही. आशा-कामना नाहीत; आजच्या पराजयांतूनही भावी पिढीला दिव्य विजय मिळेल या आशेने व श्रध्देने आजचे पराजयही स्वीकारावयास सज्ज असलेला; स्वत:च्या कामावाचून दुसरे ज्याला घर नाही; नि:स्वार्थ हेतूशिवाय अन्य ज्याची मालमत्ता नाही; जे ध्येय त्याला स्वत:ला दिसत असते व ज्याच्यासाठी तो स्वत:चे रक्त सांडीत असतो, जिवाचे रान करीत असतो, ‘ते ध्येय माझ्या इतर बंधूंच्याही दृष्टिपथात मी आणीन, त्यांनाही ते अनुभवयास व पूजावयास लावीन,’ या विचाराशिवाय, या आशेशिवाय ज्याला अन्य कसली आशा नसते;

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: