प्लॅटफॉर्म प्रवेशाचे सुसूत्र नियोजन केल्यास अपघातांची संख्या घटेल.
म टा दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ अंकातील " अंत्योदयाचे जीवघेणे प्रात्यक्षिक" संपादकीय वाचले. एकंदरीत मुंबईची लोकसंख्या अंदाजे सव्वा कोटी आहे. मुंबईत लोक रोजगार, शिक्षण आणि चांगल्या जीवनशैलीच्या शोधात येतात. या लोकसंख्येपैकी पाव टक्के लोकांनी जरी एका ठराविक दिवसात हवाई, रेल्वे, रस्ते मार्गे शहराबाहेर जायचे ठरविल्यास तीन लाखांना पुरेल एवढ्या वाहतूक व्यवस्थेचे नियोजन प्रशासनाचे हवे. यातील निम्मे नियोजन जरी कोलमडले तरी हाहाकार माजण्याची शक्यता आहे. यासाठी वर्षाच्या, सणावारीच्या प्रवासाचे मुंबईतील सहाही टर्मिनलच्या गाड्यांच्या संख्येने तिकीट वाटप जाहीर करून आगाऊ तिकीट विक्री व्हावी. तिकीट संपल्याचे सर्वीकडे जाहीर करावे. विना आरक्षित डब्यांसाठी अथवा पूर्ण अनारक्षित गाडीसाठी अधिकृत तिकीट धारकानांच फलाटावर प्रवेश द्यावा. प्लॅटफॉर्म प्रवेशाचे सुसूत्र नियोजन केल्यास अपघातांची संख्या घटण्यास नक्की मदत होऊन सामान्यांचा प्रवास सुखकर होईल.
विजय आप्पा वाणी, पनवेल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा