ढिले प्रशासन,खराब शिस्त, निष्काळजी वृत्ती परिणामी अराजकता निर्माण झाली आहे.
म टा दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ अंकातील " आहेत कुठे पोलिस ? " संपादकीय वाचले. स्कॉटलंड यार्ड पोलिसांबरोबरो तुलना करण्यात येणाऱ्या मुंबई पोलीस दलाचे काही वर्षांपासून गुन्ह्यातील तपासात अपयशी ठरत असल्यामुळे कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे . १९९० दशकात टोळी युद्धात केवळ खबऱ्यांच्या माध्यमातून , एन्काउंटर करत, गुंडाना यमसदनास पाठविणारे पोलीस आज मात्र मोबाईल , सीसीटीव्ही , सर्वोत्तम प्रकाश यंत्रणा , रस्त्यांची पायाभूत सुविधा , अद्ययावत वाहने , शस्त्रे अशा अनेक आधुनिकतेखाली सज्ज असूनही गुन्हेगारीचा आलेख कमी होत नाही . ढिले प्रशासन, खराब शिस्त यामुळे कर्तव्य पार पाडण्याबाबत निष्काळजी वृत्ती निर्माण होण्यास मदत होऊन परिणामी कायदा आणि सुव्यवस्थेत अराजकता निर्माण झाली आहे. नियुक्ती ते निवृत्ती या काळाच्या दरम्यान केवळ बदली, बढती , भ्रष्टचार, बंदोबस्त आणि सत्ताधाऱ्यांची बडदास्त या बाराखडीत अडकलेल्या पोलीस दलाकडून लैंगिक अत्याचार, विनयभंग, बलात्कार, छेडछाड या किरकोळ गुन्ह्यांकडे पाहण्यास वेळच उरत नसेल . साहजिकच आहेत कुठे पोलीस हा प्रश्न निर्माण होतो.
विजय आप्पा वाणी , पनवेल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा