सोमवार, ३० डिसेंबर, २०२४

लेख (१९१) ३१ डिसेंबर २०२४

 


नव्या सरकारने नव्या वर्षात राज्याच्या उतरलेल्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक. 

दिनांक ३० डिसेंबर २०२४ लोकसत्ता अंकातील  " महाराष्ट्राचे उत्तरायण"  दरडोई खर्चाच्या, राज्यांच्या विगतवारीत राज्याचे, उत्तरेच्या राज्यांच्या उतरंडीला आलेले स्थान दर्शविणारे संपादकीय वाचले.  उत्पन्न, योग्य मोबदला मिळाला तरच खर्च करू शकतो असे साधे  तत्व आहे.  राज्याची खरी हिच बोंब आहे.  सामन्यांना ग्रामीण भागात, निम्न शहरी भागात उत्पन्न , योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे शहरांकडे धाव घेतात. तिथेही कमी अधिक प्रमाणात सामन्यांची तीच स्थिती आहे.  उतरलेल्या, मोडकळीस आलेल्या राज्याच्या स्थितीची विविध कारणांची जंत्रीच उभी राहील. गेल्या पंचवीस वर्षात बंद पडलेल्या, स्थलांतरित झालेल्या उद्योगांची संख्या, नव्याने आलेल्या उद्योंगापेक्षा कैक पटींनी जास्त आहे.  उत्पादन क्षेत्राचा,  इतर राज्यांच्या तुलनेत मंदावलेला वेग, शेती प्रश्नातून शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण, शैक्षणिक गुणवत्तेत घसरलेली स्थिती, रस्ते, रेल्वे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपेक्षेपेक्षा कमी विकास, वाहतूक कोंडी समस्या,  वाढलेले प्रदूषण, खनिजांचा अनियंत्रित उपसा,  जलस्रोतांचे अयोग्य व्यवस्थापन, माफिया गुंडांकरवी होणारी दादागिरी यासरख्या अनंत कारणांनी समृध्द महाराष्ट्र वृध्द महाराष्ट्र झाला आहे.  देशाला सर्वाधिक जीएसटी आणि आयकर योगदान देत असणारे राज्य असेल तरी, औद्योगिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून काही क्षेत्रांमध्ये, दक्षिणेच्या राज्यांपेक्षा मागे राहिलेला दिसते.  महाराष्ट्राच्या कर रचनेत आणि परवान्याच्या प्रक्रियेत अजूनही काही अडचणी असल्यामुळे नवीन उद्योग स्थापनेसाठी आकर्षकता कमी आहे.  दक्षिणेतील राज्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठे प्रगती, पोर्ट आणि लॉजिस्टिकसाठी प्रभावी पायाभूत सुविधा उभारल्या आहेत, ज्यामुळे ते व्यापारासाठी अधिक अनुकूल बनले आहे.  तामिळनाडू आणि कर्नाटक यांनी तंत्रज्ञान शिक्षण आणि आय टी क्षेत्रात प्रचंड भर दिला आहे, तर महाराष्ट्र शिक्षणाच्या गुणवत्तेच्या समस्येने ग्रस्त आहे.  तुलनेने महाराष्ट्रात मुंबई पोर्ट , न्हावा शेवा पोर्ट सारखे बलाढ्य बंदरे आहेत, पणं निर्यातीसाठी बहुतांश माल उत्तरेकडील राज्यातून होतो हे निर्विवाद सत्य आहे. मुंबई आणि सर्वच महानगरांचे अनियोजित शहरीकरण आणि वाढती झोपडपट्टी ही मोठी समस्या आहे, जी दक्षिणेकडील शहरांपेक्षा अधिक गंभीर आहे.  बेंगळुरू, हैदराबादसारखी शहरे जागतिक आय टी हब म्हणून विकसित झाली आहेत, तर पुण्यातील हिंजवडी आय टी पार्क विस्कटलेल्या बकाल अवस्थेत टँकरच्या पाण्याने तहानलेले आहे.  अजून उतरंडीला लागण्यापेक्षा राज्याने शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी,  गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग-अनुकूल धोरण तयार करणे,  ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा आणि रोजगार निर्मितीवर भर देणे.  राज्याने केंद्राकडून अधिक निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे.  या सर्वांवर लक्ष दिल्यास महाराष्ट्राची उतरण थांबवून उत्तरोत्तर प्रगती पथावर न्यावी हीच नव्या सरकार कडून नव्या वर्षांच्या अपेक्षा.

विजय आप्पा वाणी,  पनवेल 


शनिवार, २८ डिसेंबर, २०२४

लेख १९० (२९ डिसेंबर २०२४)

 


म. टा.२२ डिसेंबर २०२४ अंकातील " सवांद" पुरवणीतील " सीमा प्रश्न सुटत का नाही ? लेख वाचला.  या घडीला , सीमा प्रश्न केवळ  औपचारिकता म्हणून चर्चिला जातो, आंदोलने छेडली जातात, याची जाणीव येणाऱ्या तिसऱ्या पिढीलाही होऊ लागली आहे.  मावळते मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी, राज्याच्या विधिमंडळात  ठराव मांडून महाराष्ट्रातील सीमारेषेवरील गावे, त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधांमध्ये वाढ, पाणी प्रश्न, या व्यतिरिक्त कर्नाटकातील ८५० सीमावर्ती मराठी भाषिक गावे विलीन करावीत असे मंजूर करून घेतले .  ठरावात मराठी भाषिक सीमावासियांना निवृत्ती वेतनात वाढ, गृहनिर्माण मंडळाच्या गाळेवाटपात सहभाग, सांस्कृतिक कार्यक्रम अनुदान, विद्यार्थ्यासाठी राखीव जागा, नोकरीत प्राधान्य, मराठी भाषेच्या विकासासाठी अनुदान, आरोग्य योजना यांचाही प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे.  या ठरावाची किती अंमलबजावणी झाली की नाही याची माहिती नाही आणि झाली असली तर सीमा वासीयांना एक चांगला दिलासा आहे.  परंतु कर्नाटक सरकार मात्र वेगवेगळ्या प्रकाराने सीमा वासीयांना दडपशाही मार्गाने प्रश्नांवर उगाचच त्रास देत आहे.

सीमा प्रश्न अनेक वर्षे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्याचा निकाल लागेल तेव्हा लागेल , तोपर्यंत सीमा भागातील मराठी भाषिकांना या सवलतींचा लाभ मिळून जीवनमान सुधारण्यासाठी वाव मिळेल. परंतु दुट्टप्पी वागणाऱ्या कर्नाटक सरकारने या सीमा वासीयांवर , महाराष्ट्र सरकारच्या सवलतींचे लाभार्थी म्हणून , कर्नाटक सरकार कडून मिळणाऱ्या शिक्षण, आरोग्य, निवास , नोकरी या सवलतींवर बंदी घातल्यास वेगळाच प्रश्न निर्माण होऊ शकतो.   महाराष्ट्र सरकारकडेही या सीमा वासीयांसाठी कायमची पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे धाडस हवे.  याचा एक चांगला परिणाम होऊ शकतो, सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक सरकारचा दूजाभाव उजेडात आणून सदर गावे / मराठी भाषिक महाराष्ट्राचेच म्हणून अधिक हक्क सांगता येईल.  या ठरावाने सीमा प्रश्नास अधिक बळकटी आणली आहे. आता फक्त धसमुसळ्या कर्नाटक सरकारचे निर्णय, वागणे आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल याची वाट पाहावी लागेल. 

विजय आप्पा वाणी, पनवेल. 

दिनांक २८ डिसेंबर २०२४


धुके . . . . .    

धुक्यात सूर्याची कोवळी किरणे जणू हरवून गेल्यासारखी वाटतात. निसर्गाने धुक्याच्या चादरीत त्या लपवून ठेवल्या आहेत, जणू त्या कोवळ्या किरणांनाही थोडा विराम हवा आहे. आकाशात लपलेल्या सूर्यासारखीच ती कोवळी किरणं धुक्याच्या मखमली पडद्यामागे लपून कधी अलवार डोकावतात, तर कधी पुन्हा धुक्याच्या पांघरुणात शिरतात.  

धुक्यातून चालताना वर्तमानात वावरत असल्याचा भास होत असला तरी मन मात्र भूतकाळात रमते किंवा भविष्याच्या अनिश्चिततेत हरवते. धुकं जसं आजूबाजूचं स्पष्ट दिसू देत नाही, तसंच आपल्या जीवनातील काही गोष्टींवर पडलेल्या काळ्या-पांढऱ्या पडद्याची आठवण करून देतं, जणू धुक्यातच हरवलेली ती गोष्ट पुन्हा सापडावी.  

पहाटेच्या प्रसन्न क्षणी पसरलेले धुके हे निसर्गाचे अलौकिक रूप असते. काळसर-निळसर आकाशात अलवार झिरपणारा प्रकाश जसा सृष्टीला साद घालतो, तसाच धुक्याचा मखमली स्पर्श धरतीला शांततेची शाल पांघरत असतो. गवताच्या पानांवरून ओघळणारे दवबिंदू आणि त्यावरून प्रतिबिंबित होणारे पहाटेचे कोवळे सूर्यकिरण यांचे दृश्य जणू स्वप्नातल्यासारखे वाटते.

झाडांभोवती अलगद गुंडाळलेले धुक्याचे पट, डोंगरमाथ्यावरून सहज खाली उतरलेले धुक्याचे जाळे, आणि दरवळणाऱ्या गार वाऱ्याबरोबर नाचणारी धुक्याची चादर मनाला ताजेतवाने करते. दूरवर दिसणाऱ्या गावाच्या वस्तीला धुक्याने मिटून टाकलेले असते, जणू निसर्गाने तीला पांघरूण घातले आहे.

धुक्याच्या या मखमली कुशीत सृष्टी शांत आणि गूढ दिसते. निसर्गाचा हा सौम्य आणि मनमोहक क्षण मनाला शांतीचा अनुभव देऊन जातो.


विवा . . .२८१२२४

गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४

लेख १८९ (६ डिसेंबर २०२४)

 

पोटनिवडणुकीतील घराणेशाही सुद्धा मारकच.

म टा दिनांक ५ डिसेंबर २०२४ अंकातील "विचार सदरातील" 'घराणेशाहीचे काय करायचे'  सविस्तर लेख वाचला. देशाचा,
राज्याचा पूर्व इतिहास पाहता, पोट निवडणुकीत निवडून आणण्यासाठी मयत सदस्यांच्या घरातीलच व्यक्तीच्या नावाचा आग्रह धरला जातो कारण सहानुभूतीच्या माध्यमातून मते मिळवून विजयाची खात्री केली जाते.  हाच प्रयोग सर्वच पक्ष राबवितर, यात खरे नुकसान होते ते समान पातळीवरील नेत्यांचे पणं पक्ष आदेशामुळे या नाराज नेत्यांना, तुमचे योग्य पुनर्वसन केले जाईल, अशी अमिषे दाखविली जातात. सहनभुतीच्या नावावर घराणेशाही सुरू होऊन, बिच्चारे नेते, कार्यकर्ते साठीच्या उंबरठ्यावर पोहोचून अस्ताला जातात. गेल्या ५० वर्षांच्या इतिहासात, अंदाजे शेकडो नेत्यांच्या निधनाने कित्येक कार्यकर्त्यांचे करिअर बरबाद झाले असेल आणि शेकडो  घराण्यातील कोणतेही राजकीय लेबल नसताना निवडून आलेले असतील. यास सत्तेचे बेरजेचे राजकारण जबाबदार आहे. सत्तालालसा हेच तत्व मोठे ठरते आणि घराणेशाही पुढे पक्ष निष्ठा , सेवा सारी एका क्षणात नष्ट होते. 

विजय आप्पा वाणी, पनवेल 

सोमवार, २ डिसेंबर, २०२४

दिनांक २ डिसेंबर २०२४ बदलापूर

 








लाड शाखीय वाणी समाज मंडळ बदलापूर या संस्थे तर्फे ३२ वा विद्यार्थी गुण गौरव समारंभ १ डिसेंबर २०२४ रोजी आदर्श विद्यालय ,बदलापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.  उपरोक्त कार्यक्रमात " सुदृढ कुटुंब व्यवस्था" या विषयावर व्याख्यान दिले.  त्याची क्षणचित्रे आणि ऑडियो व्हिडिओ यु ट्यूब वर शेअर केला आहे.