मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

लेख (१८४) ३० ऑक्टोबर २०२४


प्लॅटफॉर्म प्रवेशाचे सुसूत्र नियोजन केल्यास अपघातांची संख्या घटेल.

म टा दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ अंकातील " अंत्योदयाचे जीवघेणे प्रात्यक्षिक" संपादकीय वाचले.  एकंदरीत मुंबईची लोकसंख्या अंदाजे सव्वा कोटी आहे. मुंबईत लोक रोजगार, शिक्षण आणि चांगल्या जीवनशैलीच्या शोधात येतात.  या लोकसंख्येपैकी पाव टक्के लोकांनी जरी एका ठराविक दिवसात हवाई, रेल्वे, रस्ते मार्गे शहराबाहेर जायचे ठरविल्यास तीन लाखांना पुरेल एवढ्या वाहतूक व्यवस्थेचे नियोजन प्रशासनाचे हवे.  यातील निम्मे नियोजन जरी कोलमडले तरी हाहाकार माजण्याची शक्यता आहे.  यासाठी वर्षाच्या, सणावारीच्या प्रवासाचे मुंबईतील सहाही टर्मिनलच्या गाड्यांच्या संख्येने तिकीट वाटप जाहीर करून आगाऊ तिकीट विक्री व्हावी.  तिकीट संपल्याचे सर्वीकडे जाहीर करावे.   विना आरक्षित डब्यांसाठी अथवा पूर्ण अनारक्षित गाडीसाठी अधिकृत तिकीट धारकानांच फलाटावर प्रवेश द्यावा.  प्लॅटफॉर्म प्रवेशाचे सुसूत्र नियोजन केल्यास अपघातांची संख्या घटण्यास नक्की मदत होऊन सामान्यांचा प्रवास सुखकर होईल.


विजय आप्पा वाणी,  पनवेल 

सोमवार, २८ ऑक्टोबर, २०२४

लेख (१८३) २९ ऑक्टोबर २०२४

 


बेरोजगारी निम्म्या प्रमाणावर घटत गेल्यास किमान उत्पन्नामुळे थाली तरी परवडेल.    

लोकसत्ता दिनांक २८ऑक्टोबर २०२४ अंकातील, "थाली बचाव !" जनसामान्य आणि निवडणुका यांच्या संबंधित संपादकीय वाचले.  आजपर्यंतच्या झालेल्या सर्वच निवडणुकांत जनसामान्यांच्या प्रश्नांचा राजकारण्यांना मतांपुरताच संबंध असतो, निवडून आलेल्याना फक्त सत्तेची आस असते.  महागाई बेरोजगारी दारिद्र्यता सामान्यांच्या पाचवीला पुजलेली, त्यास योजनांद्वारे , अनुदान, हमी द्वारे निवडणूक काळात फक्त फुले उधळली जातात .  
२००८ च्या जागतिक आर्थिक मंदीनंतर अन्नधान्य, इंधन आणि अन्य वस्तूंच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याने मागील २५ वर्षांपासून महागाईचा दर वाढत आलेला आहे.  अन्नधान्य, औषधे, आणि इंधन यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या किंमती नियंत्रित करण्यासाठी किंमत नियंत्रण ,व्याजदर बदल, चलन नियंत्रण, देशांतर्गत उत्पादन , कर धोरण बदल, Direct Benefit Transfer यांसारख्या योजनांचा अवलंब करून आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर दिली गेली, ज्यामुळे पैशांचा योग्य वापर झाला. काँग्रेस आणि भाजप सरकारच्या कार्यकाळातील महागाई दरांमध्ये काही प्रमाणात फरक दिसून येतो.  पण प्रत्येक काळात वेगवेगळ्या घटकांचा परिणाम झाला आहे.  भाजपच्या कार्यकाळात महागाई काही प्रमाणात नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला आणि काही काळ महागाई दर ५-६% पर्यंत कमी झाला होता. परंतु २०२० नंतर कोविड महामारी, जागतिक बाजारातील अनिश्चितता यामुळे महागाई पुन्हा वाढली.  महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी काँग्रेस, भाजप सरकारांनी विविध उपाययोजना केल्या, परंतु जागतिक आर्थिक स्थितीचा प्रभाव, धोरणात्मक बदल, आणि वित्तीय व्यवस्थापनातील फरक यांमुळे दोन्हींच्या कार्यकाळातील महागाईचे स्वरूप वेगवेगळे राहिले आहे.  त्यामुळे "दि हिंदू "ने सर्वेक्षण केलेल्या थाळीतील वस्तूंचे दर , अल्प उत्पन्न आणि अधिक खर्चामुळे वर्षानुवर्षे खिशाला न परवडणारेच आहेत, त्यात नवीन काही नाही.  यातील महत्वाचा मुद्दा बेरोजगारी निम्म्या प्रमाणावर घटत गेल्यास उत्पन्नाचे साधन निर्माण होऊन परवडणाऱ्या दरात दोन वेळचे अन्न सुखाने खाण्यास मिळाल्यास निवडणूक काळात तरी "थाली"ऐवजी "ताली बजाव" तरी म्हणतील. 

विजय आप्पा वाणी, पनवेल 

सोमवार, २१ ऑक्टोबर, २०२४

लेख (१८२) २२ ऑक्टोबर २०२४

 


सामाजिक जागरूकता किती महत्वाची !!

म टा दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ अंकातील " कायदा गतीचा पाळा " संपादकीय वाचले.  लेखातून बालविवाह विरोधी स्थिस्ती स्पष्ट करण्यात आली आहे. आजही हे विदारक चित्र असण्याचे अनेक कारण आहेत.  भारतातील ग्रामीण, अती दुर्गम, पहाडी, दऱ्या खोऱ्यातील भागात आजही  सुधारणांना, नवं विचारांना स्थान नाही.  स्वातंत्र्यानंतर ६० वर्षात बाल विवाह होण्याचे प्रमाण घटत नसल्यामुळे सरकारने २००६ मध्ये बाल विवाह प्रतिबंध कायदा

 संमत केला, त्यासही १८ वर्षे होत आली. तरीही जुन्या विचारांचा पगडा आजही जोर धरून आहे.  शासन व्यवस्था अपुरी की,  लोकांची उदासीनता हेच कळेनासे झाले आहे.  गेल्या २० वर्षात मोबाईल क्षेत्रातील क्रांतीने आणि त्यातील सोशल मीडियाच्या रूपाने सारे जग एकवटले गेले, शिक्षित झाले, नव विचाराने प्रेरित झाले. तरीही सरकार बाल विवाह रोखण्यास असमर्थ आहे,  यावरून सामाजिक जागरूकता किती महत्वाची आहे हे  सर्वोच्च न्यायालयाच्या हि लक्षात आले.

विजय आप्पा वाणी, पनवेल 

गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०२४

लेख (१८१) १८ ऑक्टोबर २०२४

 

जागल्यांचा विचार न होता लाभार्थ्यांच्याच मतांवर सरकार निवडून येईल.

लोकसत्ता दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ अंकातील, राज्याच्या राजकारणातील पाच वर्षांच्या कालावधीतील घडामोडी, फोडाफोडी यांचा योग्य ते परामर्श घेणारे संपादकीय "को जागर्ति ? " वाचले .  खरे म्हणजे २०१४ विधानसभेच्या निकलापासूनच या दुहीची पाळेमुळे रचली गेली होती, त्यास मूर्त स्वरूप २०१९ मध्ये दिले गेले.  त्यामुळे आधीची पूर्ण पाच वर्षे सेवा देणारे आणि पुन्हा येईन म्हणाणण्याऱ्यांची पुरती गोची झाली.  यातून मार्ग काढण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच सत्तेचा सोपान चढण्याचे विविध मार्ग अवलंबिले गेले आणि विधान परिषदेतील उमेदवार निवडून त्यावर शिक्कामोर्तब केले. आघाडीला फोडाफोडीचे राजकारण करण्याची संधी न दवडता क्षणात सेनेला खिंडार पाडून, वाघास खिंडीत गाठून जायबंदी केले.  पुनश्च सत्तेच्या दुसऱ्या पायरीवर का असेना बुड टेकत असतानाच अचानक घड्याळाचा वेगवान काटा तोडून क्षणभर सगळेच थांबते की काय असे वादळ निर्माण केले आणि इथेच पायऱ्या घसरण्यास सुरुवात झाली.  त्याचा रोष आरक्षण, सेवा परीक्षा, बेरोजगारी, महागाई आदी रूपाने मोठ्या प्रमाणावर आंदोलन रूपाने समोर आणला गेला त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आलेत.  फोडलेल्या दोन्ही पक्षांकडील पूर्वीच्याच चिन्हं नाव मिळून देखील मतांच्या टक्केवारीवर भुईसपाट केले.  समोर विधानसभा निवडणूक दिसत असताना हा लाजिरवाणा पराभव जिव्हारी लागला आणि व्यक्ती, ज्ञाती समाज, जात, आरक्षण, तरुण, महिला या घटकांना समोर ठेवून रोजच्या रोज, लाडकी बहीण, प्रशिक्षण, जाती महामंडळे, आदी नवनवीन योजना घोषित होऊ लागल्या आणि आघाडीस पुन्हा ठेच लागली, त्याची मलमपट्टी करताना बदलापूर घडले पणं लाडकी बहिण, मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, आदी प्रकल्पांनी पुन्हा भुसभुशीत का असेना पाया रचत असतानाच एन्काऊंटर रुपी बदला घेत, विधानसभा निवडणुकीचा पूर्व मंडप बांधला.  कमीतकमी विधानसभा लढण्याची योग्यता प्राप्त करीत असतानाच निवडणुकीचा बिगुल वाजला.  हाती सत्ता होती , वर्तमान स्थिती, आपसातील सुंदोपसुंदी कसेतरी मिटवावेच लागतील, अन्यथा आघाडी पूर्ण ताकदीने, योजनापूर्वक हल्ला करणारच, त्यास निवडणूक पूर्व रंग नक्कीच भरले जातील, परंतु युतीच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी मुळे थोडे थोडके नाही पणं तीस टक्के लाभार्थी आहेत, जी सत्तेचा मार्ग मोकळा करणारी ठरणार आहे, यात लाभ न मिळालेली पणं मतदान करणे कर्तव्याचे आहे मानणारी वीस टाक्यांच्या मतांवर युती आघाडीत दोन्हीकडे विसावली जातील.  उर्वरित पंचवीस तीस टक्के सुट्ट्यांचे प्लॅनिंग, काही देणे घेणे नाही आविर्भावात आपापले रोजमाऱ्हा जीवन जगत राहतील.  त्यामुळे जागल्यांचा विचार न होता लाभार्थ्यांच्याच मतांवर सरकार निवडून येईल यात आश्चर्य काय ?

विजय आप्पा वाणी,  पनवेल


सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

लेख (१८०) ८ ऑक्टोबर २०२४

 


ढिले प्रशासन,खराब शिस्त, निष्काळजी वृत्ती परिणामी अराजकता निर्माण झाली आहे.

म टा दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ अंकातील " आहेत कुठे पोलिस  ? "  संपादकीय वाचले.  स्कॉटलंड यार्ड पोलिसांबरोबरो तुलना करण्यात येणाऱ्या मुंबई पोलीस दलाचे काही वर्षांपासून गुन्ह्यातील तपासात अपयशी ठरत असल्यामुळे कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .  १९९० दशकात टोळी युद्धात  केवळ खबऱ्यांच्या माध्यमातून , एन्काउंटर करत, गुंडाना यमसदनास पाठविणारे पोलीस आज मात्र मोबाईल , सीसीटीव्ही , सर्वोत्तम प्रकाश यंत्रणा , रस्त्यांची पायाभूत सुविधा , अद्ययावत वाहने , शस्त्रे अशा अनेक आधुनिकतेखाली सज्ज असूनही गुन्हेगारीचा आलेख कमी होत नाही .   ढिले प्रशासन, खराब शिस्त यामुळे कर्तव्य पार पाडण्याबाबत निष्काळजी वृत्ती निर्माण होण्यास मदत होऊन परिणामी कायदा आणि सुव्यवस्थेत अराजकता निर्माण झाली आहे.  नियुक्ती ते निवृत्ती या काळाच्या दरम्यान केवळ  बदली, बढती , भ्रष्टचार, बंदोबस्त आणि सत्ताधाऱ्यांची बडदास्त या बाराखडीत अडकलेल्या पोलीस दलाकडून लैंगिक अत्याचार, विनयभंग, बलात्कार, छेडछाड या किरकोळ गुन्ह्यांकडे पाहण्यास वेळच उरत नसेल .  साहजिकच आहेत कुठे पोलीस हा प्रश्न निर्माण होतो.  

विजय आप्पा वाणी , पनवेल