मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

लेख (१७९) २५ सप्टेंबर २०२४

 


जागतिकीकरणात आता भारतीय प्रहर  !!

म टा दिनांक २४ सप्टेंबर २०२४ अंकातील "अमेरिकेतील भारत प्रहर " अभ्यासपूर्ण संपादकीय वाचले . परराष्ट्र धोरण हे पंतप्रधान श्री मोदी यांचे मोठे बलस्थान आहे .  धाडसी , दूरदर्शी आणि खंबीर नेतृत्वाच्या बळावर भारताची प्रतिमा निर्माण करताना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आघाड्यांवरील आव्हानांना न जुमानता समर्थपणे भेटी देत आहेत .  सर्वच खंडातील लहान मोठ्या देशांच्या दौऱ्यातून सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय , सामरिक , कनेक्टिव्हिटी , क्षेत्रातील संबंधाचा विस्तार उल्लेखनीय ठरत आहेत . विशेषतः अमेरिकेतील सद्यकालीन आणि तत्कालीन सर्वच तीनही राष्ट्राध्यक्षांशी राजकीय धोरणात्मक, तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात परिणामकारण जागतिक संबंध उदयास येत आहेत .   जगातील सर्वच विकसित किंवा प्रगतिशील राष्ट्रांचे शेजारील राष्ट्रांशी संबंध बिघडले असताना , भारत मात्र सर्वच देशांशी शिखर परिषद वा तत्सम बैठकांच्या माध्यमातून परस्पर संबंध वाढवीत आहे .  यात एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावेसे वाटते ती म्हणजे प्रत्येक देशात भारतीयांचे प्रमाण लक्षणीय आहे, त्यामुळे जागतिकीकरणात आता भारतीय प्रहर दिसू लागला आहे .  

विजय आप्पा वाणी , पनवेल 



 

सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

लेख (१७८) २४ सप्टेंबर २०२४

 

पक्ष फोड्याची प्रतिमा बदलून प्रामाणिक पणाची प्रतिमाच भाजपाला वाचवू शकेल .  
 
लोकसत्ता दि २३ सप्टेंबर २०२४ अंकातील "लालकिल्ला" सदरातील भाजपला विकास तारेल कि हिंदुत्व ? लेख वाचला .  भाजपच्या परायज आणि विजयाचे असे दोन पर्व आहेत . जनसंघाचे नामांतर करून १९८० मध्येच पंच निष्ठा तत्वांवर ठाम राहून , भाजपने राजकीय वाटचाल सुरु केली.  ८४ मध्ये इंदिराजींच्या हत्येने सार्वत्रिक निआवडणुकीचे वारे बदलल्यामुळे केवळ २ जागा मिळाल्यामुळे निराशेने , भाजपने बस्तान गुंडाळण्याची भाषा केली, परंतु पुढे ८९ ते २००९ पर्यंत चढत्या क्रमाने जागा मिळवत २०१४ पहिल्यांदा सत्तेचा सोपान चढून २०२४ पर्यंत सत्ता कायम ठेवली .  भाजपच्या या चढत्या क्रमात मुख्यत्वे हिंदुत्वाची , देशप्रेमाची किनार महत्वाची होती .  अनेक वर्षे विरोधात काम केल्यामुळे विजयासाठीच्या प्रयत्नांत जे सातत्य होते ते हळुवारपणे उतरून सत्तेची नशा चढू लागली . २०१४ मधील एकहाती सत्ता मिळविल्यावर ,  अनेक लोकोपयोगी कामांचा धडाका लावला, जनतेप्रती निष्ठेचा क्रम बदलत गेला .  सत्तेच्या पहिल्या पर्वात विरोधी पक्षांना शत्रूपेक्षा कमी लेखण्याचा प्रमुख अजेंडा राबविला गेला,  व्यक्ती सापेक्ष प्रेम भक्ती सुरु झाली,  अकारण राज्याराज्यांत घटनात्मक पेच निर्माण केले गेले, सीबीआय, ईडीच्या धाकावर व्यक्तींना टार्गेट करत पक्षांतरे राबविली गेलीत आणि इथेच खरी वाताहाताला सुरुवात झाली आणि त्याची कडू फळे २४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पिछेहाटीत दिसून आलीत . आता खरा प्रश्न कि विकास का हिंदुत्व ? तर यातले कोणतेच कारण भाजपला तारू शकणार नाहीत .  यातून बाहेर पडायचे असेल तर आधी विरोधकांना कमी लेखण्याची वृत्ती,  व्यक्ती द्वेष, पक्षांची फोडाफोडी, सीबीआय , ईडीचे प्रयोग, पक्षांतर केलेल्यांना सत्तेपासून दूर ठेवून, वर्षानुवर्षे कार्य करणाऱ्या निष्ठावंतांना न्याय दिला पाहिजे .  विरोधकांच्या कोणत्याही कृतीवर आक्षेप टाळावा ,  दोन तीन महिने तरी पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांचे सर्व आंतर राज्यीय दौरे थांबवावेत आणि विशेष स्तोम न माजवता विकास कामांचे उदघाटन स्थानिक पातळीवर करावी .  जनतेचा पुन्हा विश्वास मिळविण्यासाठी, प्रामाणिकता आणि  पारदर्शिकता दाखवित, पक्षाच्या ध्येय धोरणात, नेंत्यांच्या वागण्यात बदल, जनतेला जाणवेल तेव्हा साहजिकच विजयाच्या अपेक्षा वाढतील .  जनता आता कंटाळली आहे , आपापसातील हेवेदाव्यांना, चढाओढीच्या राजकारणाला , त्यांना फक्त हवे साधे आणि शांत जीवन .   

विजय आप्पा वाणी , पनवेल 


गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

लेख (१७७) १३ सप्टेंबर २०२४

 


अभियांत्रिकी पदवी नंतरही नोकरीची शाश्वती नसल्याने अतिरिक्त जागा रिक्तच राहतात . 

म टा दिनांक १२ सप्टेंबर २०२४ संपादकीय लेखात अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहण्याबाबत अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे .  दरवर्षी राज्यात एकूण १२ लाखांच्या वर विद्यार्थी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण होत आहेत .  लेखात म्हटल्याप्रमाणे साडेतीनशेहुन अधिक महाविद्यालये आणि एक लक्ष चौसष्ट हजार जागा असताना ५१ हजाराहून अधिक जागा रिक्त आहेत , याचाच अर्थ उत्तीर्णांच्या फक्त नऊ ते दहा टक्के विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकीकडे आहे असे दिसून येते .  याचे महत्वाचे कारण म्हणजे गेल्या दहा वर्षात साडेतीनशे महाविद्यालयांपैकी फक्त मोजक्याच महाविद्यालयात आय टी कंपन्यांतर्फे कॅम्पस रिक्रुटमेंट केली जात असून फक्त हजाराच्या आतच विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त होतो आहे , प्रत्येक वर्षी उर्वरित लाख भर विद्यार्थी वर्षानुवर्षे अक्षरशः बेकार फिरत असतात कारण उत्पादन , व्यवस्थापन , मार्केटिंग, सेवा आदी क्षेत्रातील कारखान्यात कित्येक वर्षे भरती प्रक्रिया राबविली जात नाही.  या विद्यार्थ्यांना पर्यायी सेवा क्षेत्रात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर अथवा स्पर्धात्मक परीक्षेद्वारे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करावे लागतात .  या कारणांमुळेही जागा रिक्त होण्याचे प्रमाण वाढत असण्याची शक्यता नाकारता येत नाही .  

विजय आप्पा वाणी , पनवेल