सोन्याच्या दरवाढीचा देशाच्या अर्थ क्षेत्रावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम ..
म टा दिनांक २२ एप्रिल २०२५ अंकातील " गुंतवणूक संधीचे सोने " संपादकीय वाचले . भारतीयांचा सोन्याकडे ओढा केवळ आर्थिक नाही तर सांस्कृतिक , सामाजिक आणि भावनिकदृष्ट्याही खूप खोलवर रुजलेला आहे. सोन दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानलं जात कारण त्याची किंमत महागाईबरोबर वाढत जाते . सहज विकता येणार, तारण ठेवता येणार आणि कुठेही खरेदी करता येणारं एवढी सुलभता गुंतवणुकीच्या कोणत्याच व्यवहारात नाही . जागतिकीकरणाच्या ११९० च्या आधी सोनं हीच मुख्य गुंतवणूक मानली जायची , ग्रामीण भागात सोनं म्हणजे संपत्तीची खात्री. आर्थिक सुधारणानंतर शहरी भागात शेअर बाजार , म्युच्युअल फंड यांचा पसारा वाढला. शहरांच्या तुलनेने आजही साठ टक्के सोन्याची खरेदी ग्रामीण भागात केली जाते . स्वातंत्र्यांनंतर १९५० साली १०० रुपयांचा असणारा भाव , २०२५ मध्ये लाख रुपयांवर गेला, यावरून सोन्याची भाववाढ वाऱ्याच्या वेगात होत आहे. परंतु सोन्याच्या भाव वाढीमुळे देशाच्या आर्थिक सुधारणांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होत आहेत . बहुतांश सोने आयात करावे लागल्यामुळे आयात खर्च वाढल्यामुळे चालू खात्यातील तूट वाढते . निष्क्रिय गुंतवणुकीमुळे उद्योग रोजगार आणि उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक कमी होते परिणामी बँकांकडे कमी निधी राहून आर्थिक गती मंदावते . सरकारला याबाबत तातडीचे उपाययोजना करणे गरजेचे आहे .

