शनिवार, २४ एप्रिल, २०२१

खैरनार आप्पा पुणे

 श्री सिताराम विठ्ठल खैरनार ऊर्फ श्री खैरनार आप्पा, यांच्यावरील श्रध्दांजली पर लेख. 


*आप्पा*

एक अजोड व्यक्तिमत्त्व, पहिल्या भेटीतच त्यांच्या प्रेमात पडावे इतके लाघवी आणि प्रेमळ. स्वातंत्र्यपूर्व काळातील जन्म पण मैत्री मात्र एकविसाव्या शतकातील सर्वांशीच . व्यवसायाची प्रचंड आवड आणि त्यासाठी प्रचंड मेहनत, कष्ट करण्याची तयारी. व्यवसाय वृद्धी साठी अगणित वेळा आणि अगणित ठिकाणी सरकारी, खाजगी वाहनाने अगणित मैल प्रवास करणारे एकमेव व्यावसायिक.

स्वातंत्र्योत्तर काळात खरे तर खान्देशवासी , धुळे, जळगाव, किंवा नाशिक या जिल्हय़ाच्या ठिकाणी व्यवसाय, नोकरी साठी स्थायिक होत होते, पण वेगळी वाट स्वीकारणाऱ्या आप्पांनी मावळातील पुणे निवडले, आणि विद्येच्या या माहेरघरात व्यवसायासाठी सुरवात केली. परंतु व्यवसायासाठी पुणे निवडणारे आप्पांनी कोकणात रोहा, महाड माणगाव, चिपळूण पर्यन्त व्यवसाय नव्हे तर नाते, स्नेह निर्माण केला .

स्वतः व्यवसाय करणार्‍या आप्पांनी 1960 पासून अगदी या दशकापर्यंत अनेक समाजातील हजाराहून अधिक तरुणांना शिक्षण मिळवून दिले, नोकरी मिळवून दिली, त्यासोबत राहण्यासाठी घर आणि लग्न सुद्धा करून दिलेत. स्वतः व्यवसाय करणार्‍या आप्पांनी ,तरुणांना व्यवसाय करावा, यासाठी आग्रही राहिलेत, त्यातील अनेक व्यवसायिक, उद्योजक आज कोटींची उलाढाल करणारे पुण्यातील, कोकणातील नामवंत उद्योजक आहेत.

स्वातंत्र्योत्तर काळानंतर शिक्षित पिढी सामाजिक कार्यात सहभागी झाली त्याचे नेतृत्व आप्पांनी केले. सामाजिक मुखपत्र उन्नती चे प्रारंभिक कार्य आप्पांनीच केले. समाजातील अनेक संस्था, अनेक रुढी परंपरा, अनेक सामाजिक मेळावे, सामाजिक संमेलने, उपवर वधू परिचय संमेलने, या सर्वांत आप्पांचा सहभाग अग्रेसर नव्हे तर पुढाकार असायचा. स्पष्टवक्तेपणा ,परखड मते आणि पुरोगामी विचार यामुळेच समाजाच्या प्रगतीचा आलेख उंचावला. पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, आळंदी येथील धर्मशाळा आप्पांच्या कार्यकाळात उभ्या राहिल्या.

आज मितीला प्रत्येक शहरात जसे धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, मुंबई या शहरात अनेक सामाजिक संस्था प्रचंड व्याप्तीने उभ्या आहेत. आप्पांसोबत कार्य करणारे अनेक समाज नेते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. पण त्यांच्यासोबत काम करणार्‍यांची दुसरी पिढी सुद्धा आता समाज कार्यात कमी आहे, त्यामुळे आप्पांचा कामाचा कामाचा आवाका, आप्पांचे कार्य, याचा उलगडा होणे फार कठीण आहे. परंतु समाज कार्यात अढळ स्थान असणार्‍या या कर्मविराचे योगदान लक्षात रहावे आणि त्यांचे स्मरण व्हावे हिच आप्पांना, आप्पांच्या सान्निध्यातील सारे निकटवर्तीय यांच्याकडून *भावपूर्ण आदरांजली*. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: