गुरुवार, १९ मे, २०११

उपनयन

उपनयन म्हणजे काय ?

मुंज/उपनयन हा एक हिंदू धार्मिक संस्कार आहे. परंपरेनुसार, हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रियैश्य या वर्णांतील तीन वर्णांत जन्मलेल्या पुरुषांसाठीच सांगितला आहे. या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होउन स्वत:च्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. या संस्कारात यज्ञोपवीत (जानवे) धारण करणे हा मुख्य विधी असतो. लहानग्या बटुला लंगोट नेसवून इंद्रियनिग्रह समजावणारा हा महत्त्वाचा संस्कार आहे.

काही वर्षांपर्यंत फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व काही अंशी वैश्य वर्णांतील पुरुषांना हा संस्कार करवून घेण्याचा अधिकार असे. नवीन मतप्रणालीनुसार, विशेषत: नागरी महाराष्ट्रात, हे बंधन शिथिल होत चालले आहे.

गायत्री मंत्राचा उपदेश देवासवितरेश ते ब्रम्हचारी आणि मंगलाष्टका नंतर बटूचे आचार्य जे मुख निरीक्षण करतो, यापैकी, प्रत्येकाला उपनयन समजणारे तीन पक्ष होतात. वेदाध्यानाला सुरवात या दृष्टीने गायत्री मंत्राच्या उपदेशाला अनन्य साधारण महत्व देण्यात येते. आपल्या हिन्दु धर्माचा, या विश्वाचा मुळ जो प्रजापति, त्याला बटु (कुमार) अर्पण करणे हा ऐतेहासिक व अत्यन्त महत्वाचा भाग आहे. म्हणून त्याचे सोळा संस्कारात , परम्परा या दृष्टीने विशेष महत्व आहे. य्द्नोपवित, जान्वे वैगेरे, प्रजापतिचे रुप घेण्याची साधने आहेत. उपनयन म्हणजे आपला मुळ जो प्रजापति, आत्म्याने त्याच्या जवळ जाणे, त्याची वस्त्रे, त्याची विद्या आपण मिळविण्याचा प्रयत्न कारणे , केवळ या प्रमाणावरून पहाता ज्याना वेदाधिकार पाहिजे असेल त्यानी हा संस्कार करावयाचा आणि वैदिक व्हावयाचे असा मुळ उद्देश उपनयन संस्करात दिसतो सर्व सोळा संस्कारात उपनयन संस्कार श्रेष्ट होय. हा संस्कार केल्याने बटुला वेदाध्यानाचा अधिकार प्राप्त होतो. तसेच त्याला वैदिक धर्मात संगितलेली कर्मे करण्याचाही अधिकार प्राप्त होतो.
शास्त्रता: हा संस्कार त्रिवर्णकाना करण्याचा अधिकार आहे. परन्तु सध्या हा संस्कार विशेषता: ब्राह्मणात, फार तर थोड्या क्षत्रियात आणि वैश्यात करण्यात येतो. याला दुसरा जन्म मानण्याची चाल आहे. पहिला जन्म आई बापा पासून आणि दुसरा जन्म गायत्री मंत्रापासून आणि आचार्य यांच्या मुळे प्राप्त होतो. असे या संस्काराचे वर्णन वेदांतात वर्णिलेले आहे.
उप नयनाचा काल:
प्रत्येक वर्णाच्या लोकांना उप नयनाचा काल वेगळा सांगितला आहे. आठ, अकरा, व बारा अशा क्रमाने, ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांना काल सांगितला आहे. अनुक्रमे सोळा, बावीस, व चोवीस वयाच्या पुढे तरी उपनयन रहाता उपयोगी नाही.
उपनयन संस्कार बंद पडला असल्यास ;
उपनयन संस्कार तिसऱ्या पिढीत बंद पडला असल्यास, चौथ्या पिढीस प्रायच्शित देवून, पुन्हा संस्कार सुरु करण्याचे सर्वं ग्रंथकारांचे एक मत आहे. काही ग्रंथ कारांच्या मते बारा पिढ्यातही संस्कार बंद पडला असल्यास सुरु करता येतो,आणि काही ग्रंथाच्या मते हा संस्कार केव्हाही सुरु करता येतो.
घाणा भरणे, मंडप प्रतिष्टा हे काही गौण विधी आहेत.
अधिकारी :
उपनयन करण्यास मुख्य अधिकारी पिता होय.त्यानंतर आजोबा, भाऊ, किंवा जातीचा कोणीतरी, परंतु ज्याची मुंज करावयाची त्या पेक्षा वडील असावा.

उपनयन, मुंज:

महाराष्ट्रात मुंज या नावाने लोकप्रिय असलेला उपनयन हा अत्यंत महत्त्वाचा शुद्धिसंस्कार आहे. तेणेकरून मुलास अध्ययन व ब्रह्मचर्याश्रमाची दीक्षा दिली जाते. ब्राह्मण आपल्या मुलांची मुंज जन्मानंतर आठव्या वर्षी साजरी करतात, तर क्षत्रिय अकराव्या वर्षी आणि वैश्य बाराव्या वर्षी करतात. तथापि कालावधीबाबत थोडेफार स्वातंत्र्य दिलेले आहे. उपनयनाच्या सुयोग्य मुहूर्ताबद्दल धर्मशास्त्राने गुंतागुंतीचे नियम विहित केलेले आहेत.

धार्मिक विधीच्या प्रारंभी घाणा, गणपतिपूजन, मातृकापूजन आणि पुण्याहवाचन हे उपचार यथास्थित केले जातात. जर चौल ह्यापूर्वीच केलेले नसेल तर उपनयन प्रसंगी उरकून घेतात. वडील आपल्या मुलाचे डोक्यावरील काही केस कापतात. तदनंतर शेंडी व्यतिरिक्त उर्वरित केस न्हाव्याकडून कापून घेतात. बटूस (मुलास) स्नान घातले जाते. मुंज झालेल्या अविवाहित मुलांसोबत आई बटूस आपल्या मांडीवर बसवून भरविते आणि त्याच थाळीमधून स्वतः अन्नग्रहण करते.

मुंजीची मुहूर्तवेला समीप येत असताना बटू आणि त्याचे वडील ह्यांच्या दरम्यान दोन पुरोहित कुंकवाने स्वस्तिकचिन्ह रेखाटलेला अंतरपाट धरतात. पुरोहित मंगलाष्टके म्हणतात आणि आमंत्रित पाहुणे बटू आणि त्याच्या वडिलांवर अक्षता टाकतात. मुहूर्तसमयी पुरोहित मंगलाष्टके समापत करून उत्तरेकडे अंतरपाटा ओढतात. बटू वडिलांना साष्टांग नमस्कार करतो. मंगल वाद्ये वाजू लागतात आणि पानसुपारी देऊन आमंत्रितांचा सत्कार केला जातो.

उपनयन संस्काराचा आता प्रारंभ होतो. होमाग्नी प्रज्वलित करून त्यात तूप, तीळ आणी सात प्रकारच्या समिधा अर्पन करतात. लंगोट आणि पंचा असा पोषाख करून बटू ब्रह्मचर्याश्रमाची दीक्षा देण्यास्तव पुरोहितास हात जोडून विनंती करतो. पुरोहित विनंती मान्य करून त्यास पवित्र यज्ञोपवीत आणि पलाश वृक्षाचा दंडा देऊन ज्ञानार्जनास्तव उपदेश करतो. सूर्याची प्रार्थना केल्यावर बटूदेखील अग्नी समिधा अर्पण करतो. पुरोहित यज्ञाची सांगता करतो, आणि बटूस कानमध्ये गायत्रीमंत्र सांगतो. बटू गायत्रीमंत्राचा पुनरुच्चार करतो.

तदनंतर महत्त्वाचा विधी म्हणजे भिक्षावळ. गणेशमंदिरात जाऊन गणेश स्तोत्रा म्हणतात. कार्यस्थळी परतल्यावार `ओम भवति, भिक्षाम देहि' अशा शब्दात बटू आईचे आर्जव करतो, आई वात्सल्याने ओतःपोत अंतःकरणाने बटूस आशीर्वाद देऊन मिठाई तसेच सोन्या चांदीचे नाणे भिक्षा म्हणून देते. इतर आंमत्रित महिलासुद्धा भिक्षा घालतात. ब्रह्मचाऱ्याने भिक्षा मागूनच उदरनिर्वाह करावा अशी या विधीमागची भावना आहे. उपनयनातील अंतिम विधी मेधाजनन हा होय. मेधा म्हणजे बुद्धी. मेधाजनन विधीमुळे बटूची बुद्धी अध्ययन व वेदाभ्यास करण्यास समर्थ बनते अशी श्रद्धा आहे. म्हणून ज्ञान आणि वैभव यांच्या प्राप्तीस्तव बटू बुद्धिदेवतेची प्रार्थना करतो. पूर्वीच्या काळी हा विधी उपनयनाच्या चौथ्या दिवशी साजरा करीत असत. अलीकडे मात्र मेधाजनन त्याच दिवशी उरकून घेतात.

उपनयनाची सांगता करताना सुपारी आणि कलश या रुपातील अनुक्रमे गणपती आणि वरुण या देवतांना आवाहन करून नमस्कार करतात. आता बटू ब्रह्मचर्यातश्रमात पदार्पण केलेला असतो. त्याने बारा वर्षे अध्ययन करावयाचे असते. अध्ययनांनतर त्याचा समावर्तन म्हणजे सोडमुंज हा विधी करणे अगत्याचे असते. आधुनिक काळात मात्र सोडमुंज उपनयनानंतर लगेच उरकतात. त्यामध्ये बटू दर्भाची मुंज तसेच लंगोटी काढून टाकतो. जरीकाठी धोतर, कोट उपरणे, जरीची टोपी आणि पादत्राणे परिधान करून बनारसच्या यात्रेस जाण्याचे नाटक करतो. तथापि त्याचा मामा त्या मार्गापासून त्यास परावृत्त करतो आणि आपल्या मुलीचा त्याच्याशी विवाह करून देण्याचा संकल्प सोडतो, की जेणेकरून बटूने पुढे योग्य वेळी विवाहबद्ध होऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करावा.

गुरुवार, २१ एप्रिल, २०११

श्री कुलस्वामिनी पौर्णिमा महोत्सवकुलस्वामिनी नगर, ज्ञान मंदिर संकुल, डोम्बिवली (पूर्व) सर्वं कुलस्वामिनी भक्तांना सादर प्रणाम,
कुलस्वामिनी नगरात आपले सर्वं देवी भक्तांचे मन:पूर्वक स्वागत. गत वर्षाभरातील पौर्णिमांच्या व्रतांच्या उपासनेचे पहिले चरण आज संपन्न होत आहे. उपासना म्हणजे देवतांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न. या आशीर्वादाने, यश, प्रगती, आनंद, धन, आरोग्य मिळविण्याचा मार्ग सुकर होतो. उपासनेमध्ये एक अप्रतिम शक्ती आहे, जिच्या द्वारे अनेक अडथळे, दु:ख, प्रश्न, यावर मात करून आपला आत्मविश्वास वाढवू शकतो, आणि आत्मविश्वास वाढला तर अनेक गोष्टींची उकल सहज होऊ शकते, हे तर सर्वं ज्ञातच आहे. उपासनेवर विश्वास ठेवून आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता उपासना केली तर त्याचा जीवनात नक्कीच लाभ होईल. हाच एक धागा पकडून, डोंबिवलीतील कुलस्वामिनी भक्तांनी दर पौर्णिमेला, वेग-वेगळ्या निवासस्थानी हे उपासनेचे व्रत आरंभिले, या व्रताच्या सांगतेचे प्रथम चरण पूर्ण होत असल्या कारणे, कुलस्वामिनी पौर्णिमा महोत्सवाच्या रूपाने आपल्या सर्वासमोर सादर होत आहे. या कुलस्वामिनी महोत्सवात सामुहिक पूजा, होम, हवन करण्यात येत आहेत. हेतू हाच की, या द्वारे एकाच समाजाच्या १६ कुलदेवातांचे पूजन एकाच वेळेस, विद्या नगरीच्या पुण्य स्थळी आकाराला येवून मंत्र उच्चाराचा श्रवण लाभ सर्वं भाविकांना मिळून, एकत्रीकरणातून समाज उन्नती साठी याचा लाभ व्हावा. या कुलस्वामिनी महोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न होत आहे, सायं प्रार्थनेच्या समयी आदी शक्ती महा माया आणि स्त्री शक्ती या विषयावर जळगावस्थित आचार्य श्री दादा जोशी यांच्या प्रवचनाचा लाभ भाविकांना होणार आहे. याही कार्यक्रमाचे वैशिठ्य संस्कार वाणीने जपले आहे, ते आकर्षक अशा महाआरती सोहळ्याने, ते साकार होणार आहे, आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आणि सहकार्याने. श्री कुलस्वामिनी पौर्णिमा महोत्सवाची सर्व माहिती या पुस्तिकेत देण्याचा प्रयत्न केला आहे. आदी माया , आदी शक्ती आणि साडे-तीन शक्ती पिठाची निर्मिती, लाड वाणी समाजाच्या १६ कुल्देवन्ताची सचित्र माहिती, जाण्या येण्याचे मार्ग, नकाशासह दाखविले आहे. या शिवाय संस्कार वाणीच्या समाज संस्कृती दिनाच्या दिवशीचे सर्वं स्त्रोत्र पुर्नमुद्रित करीत आहोत. श्री कुलस्वामिनी पौर्णिमा महोत्सव यशस्वितेसाठी पौर्णिमा उत्सवात सहभागी होणारे भाविक आणि सर्वं समाज बांधव तर आहेतच, पण सामुहिक पूजा करणारे सर्वं पुजार्थी, पूजा, होम हवन साठीचे खास चाळीसगावाहून आलेले ब्रह्मवृंद, डोंबिवली विभागात कार्यरत सर्वं सामाजिक, आर्थिक, समाजसेवा मंडळे, मुंबई विभागात कार्यरत असलेले समन्वय समिती, संस्कार वाणी यांचेही मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे श्री कुलस्वामिनी पौर्णिमा महोत्सव ज्या ज्ञान मंदिर शाळेच्या प्रांगणात आयोजित होत आहे, त्या उदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अनमोल सहकार्य शब्दात व्यक्त करता येणार नाही. त्यांचे ऋणनिर्देश मानणे तर कर्तव्याचे ठरणार आहे. असेच सहकार्य भविष्यातील उपक्रमांना मिळेल हे निश्तितच आहे, पुन्हा एकदा आपले सर्वांचे ऋण व्यक्त करून, सर्वांचे आभार. आपले श्री कुलस्वामिनी पौर्णिमा महोत्सव समिती, संस्कार वाणी, डोंबिवली विभाग.

मंगळवार, ५ एप्रिल, २०११

गोत्र कुळ , कुलदेवता

गोत्र - 
सांप्रत आपलें नांव सांगतांना आपण स्वतचें, वडिलांचें नांव व शेवटीं आडनांपूर्वी गोत्रावरून वंश व सूत्रावरून उपशाखा कळत असे.
गोत्र शब्दाचा अर्थ कळप वा कुल. गोत्र ऋषि म्हणजे कुलप्रमुख. ज्या त्या गोत्रांतील लोक म्हणजे गोत्र ऋषींच्या शाखेंतील वंशज. गोत्रांचा विचार करतांना तें गोत्र ज्या ज्ञातीचें असेल त्या ज्ञातींतील बांधवांबद्दल ते गोत्रविचार असतात असें लक्षांत ठेवलें पाहिजे. आपल्या घराण्याची दुसऱयास ओळख पटते. प्रवर - गोत्र ऋषींना कुलप्रमुख म्हणतात. कुलप्रमुखाचे हाताखाली कुलांत यज्ञ संस्थेचें काम करणारे किंवा अध्यापन करणारे जे ऋषि असतात त्यांना प्रवर संज्ञा पडली आहे. विवाहप्रसंगीं, गुरूंना अभिवादन करतांना आणि यज्ञकर्मांत गोत्राचा व प्रवरांचा उच्चार करावा लागतो. गोत्र म्हणजे कुल. 
गोत्र ऋषि म्हणजे कुलप्रमुख. प्रवर ऋषि म्हणजे पौरोहित्य किंवा अध्यापन करणारे गुरु. 
कुलस्वामी व ग्रामदेवता कुलस्वामी - या शब्दाचा अर्थ कुलावर कृपादृष्टि ठेवणारा, कुलाचा रक्षण करणारा असा आहे. कुलस्वामी, कुलदैवत व कुलदेवता हे तिन्ही शब्द एकाच अर्थाने वापरतात. कुलस्वामी देवकोटींतील असतो लग्नमौंजीसारख्या शुभकार्यांत कुलस्वामी व कुलस्वामिनी यांची आराधना करतात. त्यांना नैवेद्य दाखवितात व तो प्रसाद म्हणून भक्षण करतात. ग्रामदेवता ह्या गांवच्या मूळ रहिवाशांच्या देवता आहेत व्रतें - विशिष्ट देवतेचीं विशिष्ट पद्धतीनें मुदतवार आराधना करून केलेल्या पूजनास व पालनास व्रत म्हणतात. कुलामध्यें कुलाचाराप्रमाणें वंशपरंपरा चालवावयाचीं व्रतें नसतात. ठराविक वर्षाच्या पालनानंतर उद्यापन करून व्रतांची सांगता होते. कुलाचार व व्रत यांत हा मोठा फरक आहे.

१. सप्तशृंगगड (वणी) - देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तश्रृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. सुमारे पाचशे पायर्‍या, देऊळ, सभागृह, दर्शनाच्या रांगेची जागा असे सर्व बांधकाम येथे नव्याने केले आहे. देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे. या ठिकाणी नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते. श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर आहेत. या शक्तिपीठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक, साक्षात ब्रम्ह स्वरूपिणी धर्मपीठ, ओंकार स्वरूप अधिष्ठान म्हणजे सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंगी देवी होय. सप्तशृंगीचे पुराणकाळापासून माहात्म्य सांगीतले जाते. या स्थानाचा `नवनाथ कालावधी' स्पष्टपणे सांगता येतो. साबरी कवित्व अर्थात मंत्रशक्ती ही देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने नाथांना प्राप्त झाली. उत्तर काळात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्र्वर, पेशवे सरकार, दाभाडे, होळकर इत्यादी देवी भक्तांचा या पीठाशी जवळचा संबंध होता असे म्हटले जाते. या पवित्र मंदिराच्या आजुबाजुस दाट जंगल आहे. सप्तशृंगीदेवीबरोबरच गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ, शितकडा इ. महत्त्वाची, पवित्र तीर्थस्थळे आहेत. सप्तशृंगगडावर अनेक मंगल पवित्र उत्सव होत असतात. गडावर गुढीपाडवा, चैत्रोत्सव, गोकूळ अष्टमी, नवरात्रोत्सव, कोजागिरी, लक्ष्मीपूजन व हरिहर भेट इत्यादी महत्त्वपूर्ण उत्सव प्रतिवर्षी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत असतात. या उत्सवांसाठी भाविक लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. सप्तशृंगीमाता ही निवृत्तीनाथांची कुलस्वामीनी होती. निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी तीन दिवस गडावर ध्यानस्थ बसले होते. अशीही एक घटना या स्थानास जोडलेली आहे. नाशिकपासून सुमारे ६५ कि.मी. अंतरावर सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्र्चिम रांगेत ही देवी वसलेली आहे. महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यातूनदेखील या देवीच्या दर्शनासाठी लोक येतात. देवीची मूर्ती ८ फूट उंचीची असून शेंदूराने लेपलेली आहे. कर्णफुले, नथ, मंगळसुत्र, कमरपट्टा, तोडे परिधान केलेली ही सप्तशृंगी देवी भक्ताच्या हाकेला धावून जाणारी आहे.

२. माहूर - (देवी रेणुकामाता)- देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरच्या गडावर रेणुकादेवीबरोबरच परशुराम मंदिर, दत्तात्रय मंदिर, अनसूया मंदिर, कालिका माता मंदिर इत्यादी धार्मिक स्थळेही आहेत. या ठिकाणीच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. माहूरच्या गडापासून जवळच ‘रामगड’ हा किल्ला असून, काही कोरीव कामे केलेल्या गुहा आहेत. हे स्थान नाशिक जिल्ह्यात, माहूर तालुक्यात आहे.

३. श्री क्षेत्र तुळजापूर (तुळजाभवानी)- महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. हे गाव बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काहींच्या मते हे १७ व्या किंवा १८ व्या शतकातील मंदिर आहे. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीची अवतार कथा आहे. कृतयुगात कर्दम ऋषीपत्नी अनुभूती तपस्येत असताना, कूकर या दैत्याने तिचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला. तपस्वी अनुभूतीने पावित्र्य रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला. देवी भगवती साक्षात प्रगटली व कूकर या दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला. साध्वी अनुभूतीच्या विनवणीवरून देवी भगवतीने या पर्वतराईत वास्तव्य केले. भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता-तुरजा-तुळजा (भवानी) या नावाने ओळखली जाते. संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात - श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात - धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात. येथील मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजास ‘परमार’ दरवाजा म्हणतात. जगदेव परमार या महान देवीभक्ताने आपले मस्तक सात वेळा देवीला अर्पण केले, अशी श्लोकरचना या दरवाजावर कोरली आहे. सभामंडपात पश्र्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनात, पूर्वाभिमुख अशी श्री तुळजाभवानी देवीची रेखीव व प्रसन्न मूर्ती आहे. मूर्ती गंडकी शिळेची असून प्रमाणबद्ध आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी असे देवीचे मनोहर रूप आहे. देवी भवानीची ही स्थलांतर करता येणारी मूर्ती आहे. वर्षातून तीनवेळा ही मूर्ती मंचकी (पलंगावर) विसावते. असे इतरत्र कोठेही आढळत नाही. गर्भगृहाच्या भिंतीवर छोटी-छोटी आकर्षक शिल्पे आहेत. सभामंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह असून इथे चांदीचा पलंग आहे. या ऐतिहासिक शक्तिपीठाबरोबरच मंदिराच्या परिसरातील कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, श्री भवानी शंकर मंदिर, होमकुंड, प्रांगणातील देवीदेवता, मातंगी मंदिर इ. धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत. हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत. उस्मानाबाद - तुळजापूर अंतर १९ कि.मी. आहे. सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे. घारशीळ, भारती बुवांचा मठ, पापनाश तीर्थ, धाकटे तुळजापूर, तीर्थकुंड, रामवरदायिनी मंदिर इत्यादी पवित्र धार्मिक स्थळे तुळजापुरात आहेत.

४. कोल्हापूर (श्रीमहालक्ष्मी )- साडेतीन शक्तिपीठांपैकी कोल्हापूरची श्रीमहालक्ष्मी प्रसिद्ध आहे. महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही. हे देवालय शिलाहारापूर्वी करहारक (कर्‍हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे असे काही संशोधक म्हणतात. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सिम भक्त होते. आपणास देवीचा वरप्रसाद मिळाल्याचे त्यांनी अनेक लेखांत लिहून ठेवले आहे. सातव्या शतकात चालुक्य राजवटीत राजा कर्णदेव याने हे देवालय बांधल्याचा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो. बर्‍याच विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे, त्याचे बांधकाम चालुक्याच्या उत्तर काळात झाले. देवळाच्या मुख्य वास्तुचे मुख्य दोन मजले आहेत. त्यांची बांधणी कोल्हापूरच्या आजुबाजुला मिळणार्‍या काळ्या दगडात केलेली आहे. देवळाचे शिखर व घुमट संकेश्वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात. देवालय आकाराने एखाद्या फुलीप्रमाणे आहे. हेमाडपंती वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी दरजा न भरता, एकमेकावर ठेवलेल्या अशा मोठमोठ्या चौकोनी दगडात केलेली आहे. देऊळ पश्र्चिमाभिमुख असून प्रवेशद्वारावर नगरखाना आहे. श्री महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथर्‍यावर उभी करण्यात आलेली आहे. मंदिरात घाटी दरवाजा, गरूड मंडप अशी सुंदर नक्षीकाम केलेली ठिकाणे आहेत. शंकराचार्यांनी या देवळाचे जे वरचे बांधकाम केले, त्याला १ लाख रुपये खर्च आला असे म्हणतात. गरूड मंडप / सभा मंडप १८४४ ते १८६७ च्या दरम्यान बांधण्यात आला. अश्र्विन नवरात्रात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथर्‍यावर ठेवून तिची पूजा करतात. देवळाच्या निरनिराळ्या ठिकाणी अनेक शिलालेख सापडले आहेत. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. मंदिराची आणि पूजेअर्चेची व्यवस्था ठेवण्यासाठी मंदिरात २० पुजारी आहेत. दर शुक्रवारी देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. कार्तिक आणि माघ महिन्यात महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. विशिष्ट दिवशी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून गाभार्‍यापर्यंत पोहोचतात आणि तेथून ती महालक्ष्मीच्या प्रतिमेवर परावर्तित होतात. ही किरणे पहिल्या प्रथम महालक्ष्मीच्या पायावर पोहोचतात व तेथून ती हळूहळू मस्तकापर्यंत पोहोचतात. हा चमत्कार सोहळा पाच मिनिटांपर्यंत चालतो. हा सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. देवळाची बांधणीच अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे की, वर्षातून केवळ दोन दिवशीच सूर्यकिरणे देवीच्या अंगावर पडतात.

साडेतीन शक्तिपीठांची दंतकथा पूर्वी दक्षाने बृहस्पतीराव या नावाचा मोठा यज्ञ केला. या यज्ञात शंकराला न बोलावता सर्व देवांना बोलावले. शिवपत्नी सती या यज्ञाला आमंत्रण नसताना गेली. यज्ञात शिवाला हबीरभाग दिला गेला नाही, त्यामुळे सतीने रागाने यज्ञात उडी घेतली. शंकराला हे कळल्यानंतर त्याने यज्ञाचा विध्वंस केला. सतीचे कलेवर (देह) हातात घेऊन श्री शंकर त्रैलोक्यात हिंडू लागले. ही स्थिती पाहून विष्णूने सुदर्शन चक‘ सोडले व सतीच्या शरीराचे ५१ तुकडे ठिकठिकाणी पाडले. हे तुकडे ज्या ठिकाणी पडले, हीच ५१ शक्तिपीठे म्हणून गणली जाऊ लागली. यांपैकी महाराष्ट्रात शक्तीची साडेतीन पीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची महासरस्वती (भवानी माता), माहुरची महाकाली आणि वणीची सप्तशृंगी देवी ही ती पीठे होत.

सोमवार, २८ मार्च, २०११

पत्रिकेचे गुणमेलन म्हणजे काय?

१)पत्रिकेचे गुणमेलन म्हणजे काय?

वधूवरांच्या पत्रिका या विवाहाच्या अनुषंगाने एकमेकींशी किती जुळतात हे पहाणे म्हणजे गुणमेलन. पत्रिका-गुणमेलन करताना वर्णगुणाला १, वैश्यगुणाला २, तारागुणाला ३, योनिगुणाला ४, ग्रहमैत्री गुणाला ५, गणगुणाला ६, राशीकूटगुणाला ७ आणि नाडीगुणाला ८ अशा चढत्या क्रमाने गुण दिलेले असून सर्व गुणांची बेरीज ३६ होते. 
हे सर्व गुण वधू-वरांच्या पत्रिकेत चंद्र कुठल्या नक्षत्रात कितव्या चरणात आहे यावर ठरलेले असते. त्यासाठी पंचांगात रेकनर सारखे कोष्टक असते. ते पाहून ३६ पैकी १८ पेक्षा अधिक गुण जमले तर विवाह जमवण्यास हरकत नाही असा निकष असतो. 
खरं तर या गुणमेलनात फक्त चंद्राचाच विचार होतो म्हणून ते परिपूर्ण किंवा ' शास्त्रीय ` नाही असे काही ज्योतिष्यांचंच म्हणणं आहे. एकंदरीत, परीक्षेसाठी असलेल्या अभ्यासक्रमात कुठल्या टॉपिकला किती गुण हे जसे दिलेले असते तसाच इथे प्रकार आहे. गुणमेलन ही संकल्पना वैवाहिक जीवनासाठी वधू-वर एकमेकास अनुरूप आहेत किंवा नाहीत हे ठरवण्यासाठी निर्माण झाली असावी. प्रेम, त्याग, सांमजस्य, या गोष्टी सुखी वैवाहिक जीवनास पोषक असतात. दोन भिन्न प्रकृतीची माणसं जर एकत्र आली तर वैवाहिक जीवनाचा समतोल ढासळतो. तसे होउ नये म्हणून त्यांच्या प्रकृतीचे मूल्यमापन पत्रिकेच्या माध्यमातून करून त्याचा निष्कर्ष सांगण्याचा प्रयत्न गुणमेलनाद्वारे केला गेला असावा. 

२)विवाह जुळवण्याचे वेळी पत्रिका बघावी का?
छत्तीस गुण जुळूनही मने न जुळल्याने अयशस्वी ठरलेल्या वैवाहिक जीवनाची उदाहरणे आहेत. पत्रिका न जुळताही समाधानी वैवाहिक जीवन जगणारी माणसं आहेत.  पत्रिकेवरून वजन, उंची, छाती, शिक्षण, विचारश्रेणी, अर्थिक क्षमता, रक्तगट, आरोग्य इत्यादि गोष्टी अजिबात समजत नाहीत. त्यामुळे पत्रिका बघण्यात काही अर्थ नाही. 
मात्र विवाह जुळवण्याची पद्धत जरूर विचारात घ्यावी. कारण प्रेमविवाहांची संख्या जशी वाढलीय् तशी घटस्फोटांची संख्याही वाढलीय्. शारिरिक आकर्षणातून निर्माण झालेलं प्रेम हे तकलादू असतं. त्यात विवेकापेक्षा भावनेचा पगडा जास्त असतो. तर दुसरीकडे सध्या प्रचलित असलेली विवाह जमवण्याची रीत ही एक प्रकारच्या जुगारासारखी आहे. तिच्यात केवळ व्यावहारिक गोष्टींसाठी बायोडाटा देतात व 'स्थळ बघण्याचा` कार्यक्रम होतो. त्यात मुलगा-मुलगी एकमेकांना थोडेबहुत प्रश्न विचारतात.यातून एकमेकाच्या व्यक्तिमत्वाचा काय अंदाज येणार? तसं ही 'माण्ूास` ओळखणं हे अवघडच काम. एकमेकाच्या सहवासात जन्म काढूनही परस्परांची खऱ्या अर्थानं ओळख न झालेली माणसं आढळतात. तिथं आपल्या आयुष्याचा साथीदार इतक्या तकलादू पद्धतीने निवडणे कितपत उचित होईल ? परिचयोत्तर विवाह हा एक चांगला पर्याय होउ शकेल. मैत्रीतून स्वभावाविषयी थोडाफार तरी अंदाज आलेला असतो. त्यामुळे अशा रितीने होणारा विवाह हा जुगार ठरण्याची शक्यता कमी. पण शेवटी, मैत्री आपल्या जागी रहाते व विवाह आपल्या जागी रहातो. 
विवाह ही व्यावहारिक बाब आहे. नुसत्या उदात्त कल्पनेने वैवाहिक जीवन काही जगता येत नाही. सांपत्तिक स्थिती, स्थावर, मानलौकीक, कौटुंबिक स्थिती या गोष्टी वा व्यावहारिक गरजा ही महत्वाच्या आहेत. फिल्मी स्टाईल प्रेमाच्या व त्यागाच्या बाता व्यवहारात कुचकामी ठरतात हे ध्यानात आल्यावर भ्रमनिरास होउन विवाह अयशस्वी ठरतात. म्हणूनच 'घटस्फोट मिळेल का?` असे ज्योतिषाकडे विचारायला जाणारा वर्ग वाढलाय. विवाह हा संस्कार न ठरता सोपस्कार व्हायला लागला आहे. 

३)मंगळदोष म्हणजे काय?
जन्मकुंडलीत १, ४, ७, ८, १२ यापैकी कुठल्याही स्थानात मंगळ असेल तर तो मंगळदोष आहे असे समजले जाते. ताऱ्यांच्या तेजाची जशी प्रतवारी असते तशी या मंगळाच्या कडकपणाचीही प्रतवारी आहे. कडक मंगळ, सौम्य मंगळ, क्षम्य मंगळ ही प्रतवारी कशी ठरवतात तर पत्रिकेतला मंगळ राशीबल व स्थानबळ यांच्यामुळे किती पॉवरफुल आहे यावरून ठरवतात. 
जन्मकुंडलीत बारा स्थाने असतात त्यातल्या पाच स्थानात मंगळ असण्याची शक्यता जवळजवळ चाळीस टक्के असते. म्हणजे शेकडा ४० टक्के कुंडल्यात हा पीडादायक मंगळ असणारच! त्यामुळे विवाह जुळवणे फार मुश्कील व्हायचे म्हणून पूर्वाचार्यांनी काही अपवाद शोधून काढले. 
सौम्य मंगळ, क्षम्य मंगळ असे ते अपवाद आहेत. मंगळ-दोषाचा हा इतिहास काही फार प्राचीन नाही, अलीकडचाच म्हणजे १७ व्या शतकापासूनचा आहे पण त्याचा जबरदस्त पगडा लोकांच्या मनावर बसला आहे. मंगळदोषाचे उल्लेख हे मुहूर्त गणपती, मुहूर्त चिंतामणी, भाव चिंतामणी, ज्योतिर्महार्णव अशा ग्रंथांमध्ये आढळतात. मुहूर्तचिंतामणी या ग्रंथामध्ये मंगळदोषासाठी अपवादही सांगितले आहेत. वधूच्या पत्रिकेत जर वरील स्थानापैकी एकात मंगळ असून वराच्या पत्रिकेतही तशाच स्थानात असेल तर मंगळाने मंगळास जाब पाहिला असे म्हटले जाते.  पत्रिका गुणमेलनात जर २७ किंवा त्यापेक्षा अधिक गुण झाले तर मंगळाकडे काणाडोळा करू लागले. अशा रितीने मंगळाचे अपवाद वाढू लागले. अनेक मान्यवर ज्योतिषांनी सुद़्धा मंगळ-दोष हे खूळ आहे अशी सडेतोड भूमिका घेतली.  

४)एकनाड असल्यास रक्तगट एक येतो व संतती होत नाही अथवा अडचणी येतात यात तथ्य काय?

फलज्योतिषात नाडी या शब्दाचा नेमका अर्थ काय ते कुठेही स्पष्ट सांगितलेले नाही. एकनाड-दोषामुळे होणारे दुष्परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सांगितले आहेत. नाडीग्रंथात नाडी म्हणजे एक पळाचा अवधी. शरीरशास्त्रात नाडी म्हणजे रक्तवाहिनी. फलज्योतिषात अमुक नक्षत्रावर जन्मलेल्या माणसाची नाडी अमुक एवढेच सांगितले आहे. अंत्य, आद्य, मध्य अशा तीन प्रकारच्या नाड्या सांगितलेल्या आहेत. जगातला प्रत्येक माणूस या तीनपैकी कोणत्या तरी एका नाडीचा असतोच. पंचांगात अवकहडा चक्र नावाचे एक कोष्टक असते. त्यावरून जन्मनक्षत्राच्या आधारे तुमची नाडी कोणती ते कळते. उपवर मुलगा व मुलगी या दोघांची नाडी एकच आहे असे दिसले तर तिथे एकनाडीचा दोष आहे म्हणून त्या दोघांचे लग्न करू नये कारण अशा जोडप्याला संतती होत नाही अशी वेडगळ श्रद्धा प्रचलित आहे. 
पत्रिका-गुणमेलनात नाडीला सर्वात जास्त म्हणजे आठ गुण दिले आहेत. नाडीचा संबंध रक्तगटाशी जोडण्याचा प्रयत्न काही ज्योतिषीलोक करतात पण तो त्यांचा कावेबाजपणा आहे. का? ते पहा. रक्तगट हे अे, बी, अेबी, ओ, आरएच पॉझिटीव्ह व निगेटीव्ह असे एकूण आठ प्रकारचे आहेत. तीन नाडया व आठ प्रकारचे रक्तगट यांचा कुठेही ताळमेळ बसत नाही. पत्नीचा रक्तगट आरएच निगेटिव्ह व पतीचा रक्तगट आरएच पॉझिटिव्ह असल्यास एक प्रॉब्लेम निर्माण होतो तो असा की, त्या जोडप्याच्या पहिल्या अपत्याला जरी काही त्रास झाला नाही तरी नंतरच्या अपत्याला धोका संभवतो. पण यावरही आता डॉक्टरी उपाय निघाला आहे. एकनाड-दोषामुळे जोडपे निपुत्रिक रहाते ही समजूत जर खरी असती तर संभवनीयतेच्या नियमानुसार जगातली एक-तृतीयांश जोडपी निपुत्रिकच राहिली असती! पण तसे काहीच आढळत नाही. यावरून उघड दिसते की ही समजूूत म्हणजे एक खुळचटपणा आहे. एकनाड-दोषाला काही अपवाद गर्गसंहितेमध्ये दिले असले तरी पूर्वीच्या - व आजच्याही -ज्योतिष्यांच्या अडाणीपणामुळे म्हणा किंवा अंधानुकरणाने म्हणा एकनाडीचे फालतू स्तोम माजले आहे.एकनाड-दोषावर आजवर झालेल्या टीकेचा एक परिणाम असा झालेला दिसतो की आता दाते पंचांगात पृष्ठ ८६ वर नाडी-दोषाचे वेगळेच परिणाम सांगण्यात आले आहेत. तिचा संबंध आता संततीशी नसून माणसाच्या स्वभावाशी जोडण्यात आला आहे, संतती बाबत मौन पाळण्यात आले आहे, पण एकनाडीमुळे मृत्यूदायक दोष निर्माण होतो अशी दहशत आता पृष्ठ ९० वर घातली आहे ! दुसरा महत्वाचा बदल म्हणजे एकनाड -दोष ठरवण्यासाठी आख्ख्या नक्षत्राऐवजी त्याचा फक्त एक चरणच विचारात घ्यावा असे नरपतिजयचर्या स्वरोदय या ग्रंथाचा आधार देउन सांगितले आहे. या बदलामुळे एकनाड -दोषाच्या केसेसचे प्रमाण एकदम खाली येउन ते फक्त २५ टक्क्यावर येते असा दावा केला आहेे. पण या प्रकाराचा खरा अर्थ काय होतो ते पहा. गेली शेकडो वर्षे चालत आलेल्या रूढीमुळे ७५ टक्के केसेस मध्ये निष्कारणच एकनाड-दोष मानून स्थळे नाकारली गेली असाच याचा अर्थ होत नाही का ? 

५)  मृत्यूषडाष्टक काय आहे?
समजा तुमची जन्मरास मेष आहे व तुम्हाला सांगून आलेल्या जोडीदाराची रास कन्या आहे. मेषेपासून कन्या रास ६ वी येते. कन्येपासून पुढे मोजल्यास मेष रास आठवी येते. सहा-आठ म्हणजे षडाष्टक. असा योग असलेल्या जोडीदारांचे एकमेकाशी पटत नाही अशी समजूत आहे. षडाष्टक शब्दामागे मृत्यू हा शब्द जोडला म्हणजे एकदम दहशत निर्माण होते. ज्योतिषांना तेच हवे असते. ते अशी समजूत घालतात की मृत्यू शब्दाचा अर्थ वैवाहिक सुखाचा मृत्यू असा घ्यायचा. हाच अर्थ शास्त्रकारांना अभिप्रेत आहे. ज्योतिष्यांचे एकूण धोरण काय तर विवाह या गोष्टीसंबंधात मंगळ, मृत्यूषडाष्टक, एकनाड असे काहीतरी प्रश्न वा अडचणी आपणच आधी निर्माण करायच्या व आपणच त्याला 'शास्त्राधार` देउन मार्गदर्शन करण्याचा आव आणायचा व स्वत:च्या तुमड्या भरायच्या. 

६) मुहूर्त पहाणे योग्य का अयोग्य?
मुहूर्त म्हटले की भास्कराचार्य-लीलावतीची गोष्ट हमखास सांगितली जाते. लीलावती ही भास्कराचार्यांची लाडकी लेक. तिच्या कुंडलीत वैधव्ययोग होता. पण भास्कराचार्यांनी असा विवाहाचा मुहूर्त शोधून काढला की तिचा वैधव्ययोग टळेल. पण विवाहाचे वेळी अक्षतेचा दाणा का मणी घटिकापात्रात पडलेने तो तळाशी जावून भोकात अडकला व मुहूर्त चुकला व शेवटी व्हायचे तेच झाले. या दंतकथेच्या छटा बदलतात पण आशय तोच. मुहुर्ताची महती. थोडा इकडेतिकडे झाला की काय उलथापालथ? मे महिना म्हणजे सुट्टी,लग्नसराईचे दिवस. आता या काळात लग्नाचा मुहूर्त नाही म्हणजे गैरसोयच नाही का? कार्यालयाची उपलब्धता हा पण हल्ली एक महत्वाचा मुद्दा झाला आहे. मुहूर्त असलेल्या तारखांना कार्यालय मिळणे हे देखील भाग्यच मानायची वेळ आली आहे. पंचांगात रेडीमेड मुहूर्त दिलेले असतात. पण हे रेडिमेड मुहूर्त सुद्धा 'लाभतात` की नाही हे बघावे लागते. जसे रेडिमेड कपडे सर्वांनाच 'फिट` होतील असे नसतात कधी कधी ते 'अल्टर` करावे लागतात तसेच मुहूर्ताचे आहे. एखादी वेळ ही कुणासाठी आनंदाची असते तर कुणासाठी दु:खाची असते, कुणासाठी कसोटीची असते तर कुणासाठी निवांतपणाची असते, कुणासाठी जोडायची असते तर कुणासाठी तोडायची असते, कुणाची जन्माची असेल तर कुणाची मृत्यूची असेल. कुणाची कशीही असो ती ग्रहांच्या सोयीची असते म्हणून तिला मुहूर्त म्हणायचे.  मुहूर्ताना महत्व देणं - न देणं हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे. 

७) गुरुबल कशासाठी बघतात?
विवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या शुभ ग्रहाची साथ आहे की नाही हे पहातात. हे मंगल प्रसंग असतात त्यामुळे अशा प्रसंगी अमंगल ग्रहांची वाकडी नजर पडून काही अमंगळ होउ नये म्हणून गुरुबळ बघितले जाते. गुरु हा ग्रह नैतिक बळ देतो, चांगले गुण वृद्धिंगत करतो. गुरु जर अनुकूल नसेल तर गुरुच्या सुवर्ण प्रतिमेचे पूजन करून तो अनुकूल करून घेता येतो.

८) मूळ नक्षत्रावर जन्मल्यावर शांंती करावयास का सांगतात?
मूळ नक्षत्र हे तमोगुणी, दारूण, अनिष्ट मानले गेले आहे. त्यामुळे मूळ नक्षत्रावर मूल जन्मले तर ते आईबापाच्या मूुळावर आले आहे असा समज निर्माण झाला. त्यातला अनिष्ट भाग काढून टाकण्यासाठी त्याची शांती करण्याचे प्रकार अर्थातच भीतीपोटी निर्माण झाला. 


९) मूळ नक्षत्र सासऱ्यास वाईट आश्लेषा नक्षत्र सासूस वाईट असे म्हणतात ते कितपत बरोबर आहे?
वर आपण मूळ नक्षत्राच्या इतिहासात जे बघितले त्याचीच ही पुढची मालिका आहे. जेष्ठा नक्षत्र दीरास वाईट वगैरे वगैरे. मुलगी सासरी आल्यानंतर जर काही दुर्घटना घडली तर त्याचे खापर लगेच मुलीच्या पायगुणाशी जोडून काहीतरी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच कुठतरी नक्षत्राशी संबंध जोडून काहीतरी बादरायण संबंध प्रस्थापित केला जातो. 

१०) गुरु संततीकारक ग्रह का मानतात?
गुरुलाच संतती देण्याचा मक्ता कुणी दिला याविषयी खुलासा सापडत नाही. तसे सर्वच ग्रहाचे कारकत्व कुणी ठरविले यालाही समर्पक उत्तर नाही. केवळ ग्रंथप्रामाण्य हेच त्याचे उत्तर आहे. पण गुरु हा संततीकारक ग्रह आहे याविषयी मात्र ज्योतिषांचे एकमत आहे!