सोमवार, २६ फेब्रुवारी, २०२४

लेख (१६९) २७ फेब्रुवारी २०२४

 


दलालांचे हित पहा पण शेतकऱ्यांना माफक भाव द्या . 

 
दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ अंकातील  "हमी हमी , आमची जास्त , तुमची कमी " संपादकीय वाचले . इतिहास पाहता एकंदरीत कोणतेही  केंद्र अथवा राज्य सरकार, शेतकऱयांच्या  पाठीशी ठामपणे उभे राहिलेले नाही .    अभ्यासू नेतृत्वातून , राजकीय आखाड्यातून शेतकऱयांची अनेक आंदोलने झालीत , पण मार्ग काही निघत नाहीत .  याच अनुषंगाने राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना होऊन त्यातील  उद्दिष्ठाना, शिफारशींना गेल्या पंचवीस वर्षात किती महत्व दिले हे सर्वश्रुत आहे .  पिकविणारा शेतकरी आणि ग्राहक यांची एकूण लोकसंख्येएवढीच संख्या असून सुद्धा, पैशाच्या पिकाच्या भावाला पटीत भाव वधारून दलालांमार्फत, ग्राहकाला रुपयात विकली जाणारी साखळी खूपच मजबूत आहे, त्याचे महत्व सर्वच सरकारे जाणून आहेत.  मुख्य उत्पादन खरीप, रब्बी हंगामातून निर्माण होणाऱ्या पिकांना भाव मिळावा एवढीच अपेक्षा शेतकऱ्यांची असली तरी , वर्षानुवर्षे दलालाची बसलेली घडी विस्कटविणे कोणत्याच सरकारांना शक्य नाही .   कॉर्पोरेट क्षेत्रातील मॉल च्या साखळीतून शेतकरी / पणन महासंघ खरेदीमुळे , दलालांच्या संख्येला काही प्रमाणात आळा बसत चालला आहे,  परंतु अल्पभूधारक शेतकरी, त्यांची पिके यांना स्थानिक आडते यांच्यावरच अवलंबून राहून माल विकावा लागतो .  यासाठी शेतकरी आयोगाच्या शिफारशी काही प्रमाणात तरी अंमलात आणल्यास शेतकऱ्यांना लाभ मिळेलच आणि दलालांचीही साखळी तुटणार नाही, हेही  सरकारांना तितकेच महत्वाचे राहील . 

विजयकुमार वाणी , पनवेल 

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४

लेख (१६८) २१ फेब्रुवारी २०२४

 


सत्ताधाऱ्यांच्या अक्षम्य चुकांमुळे न्यायालयीन नित्यनियम कामकाजाचा खोळंबा .  
 
दिनांक २० फेब्रुवारी २०२४ अंकातील  "न्यायालयाचे खडे बोल" वृत्त वाचले .   गेल्या दोन तीन वर्षांचे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल पाहता,  फटकारणे ,कोरडे ओढणे , खडे बोल , इत्यादी अलंकारांनीच युक्त सर्वोच्च न्यायालयाचे निकाल सत्ताधारांच्या विरोधात गेलेले आहेत . त्यातील ठळक , शेतकरी आंदोलन , राज्यपाल नियुक्ती, महाराष्ट्र सत्तांतर , बिल्किस बानो , दिल्ली प्रशासन , न्यायाधीश नियुक्ती पॅनल, चंदीगड महापौर, निवडणूक रोखे , अशा अनेक प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्राचे धिंदवडे काढले आहेत .  भारतीय राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत असे कायदे बहुमताने बनविणे , हे मुख्य कार्य संसदेचे असते , म्हणजे कायद्याचे ज्ञान आवश्यक असताना देखील न्यायालयाच्या कक्षात यांची प्रकरणे निकालात निघतात , याचे भान सत्ताधाऱ्यांना कधी येणार आहे कीं नाही .  सत्तेच्या मस्तीत घेतलेल्या निर्णयांच्या विरोधात संबंधितांनी उच्च, सर्वोच्च न्यायालयात त्वरित दाद मागितल्याने न्यायालयही दखल घेत निकाल देतात , पण या प्रकरणांत जुनी , उर्वरित प्रकरणे अजून मागे राहतात, त्यामुळे संबंधित त्यास न्यायालयिन खोळंबा म्हणावयास म्हणावयास मोकळे होतात . 

विजयकुमार वाणी , पनवेल