मुंज/उपनयन हा एक हिंदू धार्मिक संस्कार आहे. परंपरेनुसार, हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय व व
काही वर्षांपर्यंत फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व काही अंशी वैश्य वर्णांतील पुरुषांना हा संस्कार करवून घेण्याचा अधिकार असे. नवीन मतप्रणालीनुसार, विशेषत: नागरी महाराष्ट्रात, हे बंधन शिथिल होत चालले आहे.
उपनयन, मुंज:
महाराष्ट्रात मुंज या नावाने लोकप्रिय असलेला उपनयन हा अत्यंत महत्त्वाचा शुद्धिसंस्कार आहे. तेणेकरून मुलास अध्ययन व ब्रह्मचर्याश्रमाची दीक्षा दिली जाते. ब्राह्मण आपल्या मुलांची मुंज जन्मानंतर आठव्या वर्षी साजरी करतात, तर क्षत्रिय अकराव्या वर्षी आणि वैश्य बाराव्या वर्षी करतात. तथापि कालावधीबाबत थोडेफार स्वातंत्र्य दिलेले आहे. उपनयनाच्या सुयोग्य मुहूर्ताबद्दल धर्मशास्त्राने गुंतागुंतीचे नियम विहित केलेले आहेत.
धार्मिक विधीच्या प्रारंभी घाणा, गणपतिपूजन, मातृकापूजन आणि पुण्याहवाचन हे उपचार यथास्थित केले जातात. जर चौल ह्यापूर्वीच केलेले नसेल तर उपनयन प्रसंगी उरकून घेतात. वडील आपल्या मुलाचे डोक्यावरील काही केस कापतात. तदनंतर शेंडी व्यतिरिक्त उर्वरित केस न्हाव्याकडून कापून घेतात. बटूस (मुलास) स्नान घातले जाते. मुंज झालेल्या अविवाहित मुलांसोबत आई बटूस आपल्या मांडीवर बसवून भरविते आणि त्याच थाळीमधून स्वतः अन्नग्रहण करते.
मुंजीची मुहूर्तवेला समीप येत असताना बटू आणि त्याचे वडील ह्यांच्या दरम्यान दोन पुरोहित कुंकवाने स्वस्तिकचिन्ह रेखाटलेला अंतरपाट धरतात. पुरोहित मंगलाष्टके म्हणतात आणि आमंत्रित पाहुणे बटू आणि त्याच्या वडिलांवर अक्षता टाकतात. मुहूर्तसमयी पुरोहित मंगलाष्टके समापत करून उत्तरेकडे अंतरपाटा ओढतात. बटू वडिलांना साष्टांग नमस्कार करतो. मंगल वाद्ये वाजू लागतात आणि पानसुपारी देऊन आमंत्रितांचा सत्कार केला जातो.
उपनयन संस्काराचा आता प्रारंभ होतो. होमाग्नी प्रज्वलित करून त्यात तूप, तीळ आणी सात प्रकारच्या समिधा अर्पन करतात. लंगोट आणि पंचा असा पोषाख करून बटू ब्रह्मचर्याश्रमाची दीक्षा देण्यास्तव पुरोहितास हात जोडून विनंती करतो. पुरोहित विनंती मान्य करून त्यास पवित्र यज्ञोपवीत आणि पलाश वृक्षाचा दंडा देऊन ज्ञानार्जनास्तव उपदेश करतो. सूर्याची प्रार्थना केल्यावर बटूदेखील अग्नी समिधा अर्पण करतो. पुरोहित यज्ञाची सांगता करतो, आणि बटूस कानमध्ये गायत्रीमंत्र सांगतो. बटू गायत्रीमंत्राचा पुनरुच्चार करतो.
तदनंतर महत्त्वाचा विधी म्हणजे भिक्षावळ. गणेशमंदिरात जाऊन गणेश स्तोत्रा म्हणतात. कार्यस्थळी परतल्यावार `ओम भवति, भिक्षाम देहि' अशा शब्दात बटू आईचे आर्जव करतो, आई वात्सल्याने ओतःपोत अंतःकरणाने बटूस आशीर्वाद देऊन मिठाई तसेच सोन्या चांदीचे नाणे भिक्षा म्हणून देते. इतर आंमत्रित महिलासुद्धा भिक्षा घालतात. ब्रह्मचाऱ्याने भिक्षा मागूनच उदरनिर्वाह करावा अशी या विधीमागची भावना आहे. उपनयनातील अंतिम विधी मेधाजनन हा होय. मेधा म्हणजे बुद्धी. मेधाजनन विधीमुळे बटूची बुद्धी अध्ययन व वेदाभ्यास करण्यास समर्थ बनते अशी श्रद्धा आहे. म्हणून ज्ञान आणि वैभव यांच्या प्राप्तीस्तव बटू बुद्धिदेवतेची प्रार्थना करतो. पूर्वीच्या काळी हा विधी उपनयनाच्या चौथ्या दिवशी साजरा करीत असत. अलीकडे मात्र मेधाजनन त्याच दिवशी उरकून घेतात.
उपनयनाची सांगता करताना सुपारी आणि कलश या रुपातील अनुक्रमे गणपती आणि वरुण या देवतांना आवाहन करून नमस्कार करतात. आता बटू ब्रह्मचर्यातश्रमात पदार्पण केलेला असतो. त्याने बारा वर्षे अध्ययन करावयाचे असते. अध्ययनांनतर त्याचा समावर्तन म्हणजे सोडमुंज हा विधी करणे अगत्याचे असते. आधुनिक काळात मात्र सोडमुंज उपनयनानंतर लगेच उरकतात. त्यामध्ये बटू दर्भाची मुंज तसेच लंगोटी काढून टाकतो. जरीकाठी धोतर, कोट उपरणे, जरीची टोपी आणि पादत्राणे परिधान करून बनारसच्या यात्रेस जाण्याचे नाटक करतो. तथापि त्याचा मामा त्या मार्गापासून त्यास परावृत्त करतो आणि आपल्या मुलीचा त्याच्याशी विवाह करून देण्याचा संकल्प सोडतो, की जेणेकरून बटूने पुढे योग्य वेळी विवाहबद्ध होऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करावा.