शनिवार, २२ मे, २०२१

श्री नवनाथ

 प्रणाम अलख आदेश,

गोरक्ष खंड २
श्री नवनाथ संप्रदायाची वेशभूषा

नाथसंप्रदायिकांच्या श्रद्धेनुसार श्रीदत्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे. उपास्य दैवत म्हणून नव्हे, तर सिद्धिदाता गुरू आणि अवधूतावस्थेचा आदर्श म्हणून नाथसंप्रदायात दत्तांचे महिमान गायलेले आहे. नाथपंथाचा महनीय वारसा घेऊन वारकरी संप्रदायाचे संजीवन करणारे श्रीज्ञानेश्वर हे नाथ परंपरेतील संत होत. ज्ञानेश्वरांच्या अभंग गाथेत ‘ज्ञानदेवांच्या अंतरी दत्तात्रेय योगिया’ असा दत्तविषयक एक अभंग आहे. नाथसंप्रदायामध्ये दत्तात्रेयांना फार मोठे स्थान आहे. योगविद्या, मंत्रसिद्धी, सिद्धिसामथ्र्य, वैराग्य, तपश्चर्या आणि अध्यात्मज्ञान यांमध्ये नाथसंप्रदायातील लोक पूर्ण समर्थ होते. या संप्रदायाचा उगम मध्ययुगीन काळात सामान्यत: इसवी सनाच्या आसपास झालेला आहे. नाथसंप्रदायाचे उगमस्थान आदिनाथ भगवान शंकर हेच आहेत. नाथसंप्रदायाच्या उत्तरकालीन ग्रंथात दत्तगोरक्षाच्या अद्भुत कथांचे वर्णन आहे. दत्तप्रबोध या ग्रंथात मत्स्येंद्र व गोरक्षांना दत्तात्रेयाने गिरनार पर्वतावर उपदेश केल्याचा वृत्तांत पाहावयास मिळतो. नवनाथ भक्तिसार या ग्रंथात नागनाथ आदि नाथांना दत्तदर्शनाचा लाभ झालेला दिसून येतो. सुमारे सातशे वर्षांपूर्वी दत्त उपासनेचा प्रचार या संप्रदायाने नेपाळपर्यंत पोहोचवला असे इतिहास सांगतो. नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सर्व सिद्धयोगी हे श्रीदत्तप्रभूंचे अंशावतार आहेत. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चर्पटनाथ, नागनाथ, भर्तरिनाथ, रेवणसिद्ध व गहनीनाथ हे नवनाथ आहेत. त्यांच्या स्मरणमात्रानेच शुभफळ सिद्ध होते. श्रीदत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यांवर अपार असते.

नाथपंथीयांची वेशभूषा

१) भस्म- भस्माला विभूती असेही म्हणतात. काही ठीकाणी क्षार असाही उल्लेख आढळतो. भस्म हे योग्याच्या वेशभूषेचे एक आवश्यक अंग आहे. ते काही असले तरी नाथपंथीयाने भस्म हे लावले पाहीजे. सर्व देहाचे अखेर भस्मच होणार आहे. यासाठी देहावरील प्रेम कमी करून आत्माकडे मन केंद्रित करा असा संदेशच जणू काही भस्म देत आहे. शिवाय भस्मधारणेमुळे त्या त्या ठिकाणची शक्तिकेंद्रेही जागृत होतात. भस्माचे असे महात्म्य असल्यानेच नाथपंथीयांनी त्याचा अगत्याने स्वीकार केल्याचे दिसते.

२) रूद्राक्ष- हे एका झाडाचे फळ असून त्यास रूद्र अक्ष म्हणतात. शिवाचा नेत्र असा शब्दाचा अर्थ आहे. जपासाठी रूद्राक्ष माळ वापरतात. लक्ष्मी स्थिरावणे, शस्त्राघात न होणे अशा काही हेतूंसाठीही रूद्राक्षांच्या माळा विशेष करून वापरल्या जातात. शिवाय रूद्राक्षांचे औषधी गुणधर्मही अनेक आहेत.

३) मुद्रा- मुद्रा हे नाथपंथातील एक महत्वाचे साधन आहे. ही मुद्रा कानाच्या पाळीस छिद्र पाडून त्यात घातली जाते. ही बहूदा वसंत पंचमीच्या शुभ दिवशीच धारण केली जाते. अशा मुद्राधारक योग्यांनाच कानफाटे योगी असेही म्हणतात.कारण ते कानात छिद्र पाडून ती धारण केलेली असते.

४) कंथा- कंथा हे भगव्या रंगाचे वस्त्र. यालाच गोधडी अथवा गुदरी असेही नाव आहे, आपल्या वाकळेसारखे चिंध्यांचे हे बनविलेले असते.

५) मेखला- सूमारे २२ ते २७ हात लांबीची ही लोकरीची बारीक दोरखंडासारखी दोरी असून, नाथ योगी ही कमरेपासून छातीपर्यंत विशिष्ट पद्धतीने गुंडाळतात. ही कटिबंधिनी मोळ्याच्या दोरीची करतात. कधी ही मेंढीच्या लोकरीचीही असते. मेखला दुहेरी पदरात असून तिच्या शेवटच्या टोकाला घुंगरू लावलेले असते.

६) हस्तभूषण मेखली- बारीक सुतळीएवढ्या जाडीची ही लोकरीची दोरी असून ती मनगटावर बांधतात. चार फुटांच्या या मेखलीवर रूद्रमाळ बांधलेली असते.

७) शैली- ही सुद्धा लोकरीची असून दुपदरी शैली जानव्यासारखी घातली जाते. शैलीच्या टोकाला लोकरीचा गोंडा असतो.

८) शृंगी- जानव्याच्या शेवटी अडकवलेली हरणाच्या शिंगाची बनवलेली ही एक प्रकारची शिट्टीच होय. शृंगी बांधलेले जानवे ''शिंगीनाथ जानवे'' म्हणून ओळखले जाते. शृंगीची वा शिंगीची लांबी साधारणपणे एक इंच असते. भिक्षेचा स्वीकार केला, की शिंगी वाजविण्याचा प्रघात आहे.

९) पुंगी- ही सुद्धा हरणाच्या शिंगाची बनविलेली असते. साधु दारासमोर भिक्षेसाठी आला, की पुंगी वाजवितो. पुंगी शृंगीपेक्षा बरीच मोठी म्हणजे ७ ते ८ इंच लांबीची असते पुंगी डाव्या खांद्यात अडकवून ठेवलेली असते.

१०) जानवे- नाथपंथीयांचे जानवे हा एक विशेष प्रकार आहे. ते लोकरीच्या पाच -सात पदरांचे असून त्यात शंखाची चकती अडकवलेली असते चकतिच्या छिद्रात तांब्याच्या तारेने एक रूद्राक्ष बसविलेला असतो.त्याच्या खालीच शृंगी अडकवलेली असते. हा गोफ म्हणजेच नाथपंथी जानवे होय.

११) दंडा- दिड हात लांबीची ही एक काठी असते.हीस गोरक्षनाथ दंडा असे नांव आहे. नाथपंथी साधूच्या हातात ती असते.

१२) त्रिशूळ- साधनेत विशेष अधिकार प्राप्त झाला, त्रिशूळ वापरतात.नवनाथश्रेष्ठी त्रिशूळधारी होते सामरस्यसिद्धी ज्यांनी प्राप्त केली ते केवळ त्रिशूळधारी होत.

१३) चिमटा- अग्निदीक्षा घेतलेला साधक चिमटा बाळगतो. याची लांबी साधरणतः २७, ३२, ५४, इंच अशी असते. चिमट्याच्या टोकाला गोल कडे असते. त्यात पुन्हा नऊ लहान कड्या असतात. नाथपंथीयांची चाल या विशिष्ट नादावर व धुंदीत असते. अग्निचे उपासक नाथपंथी धुनी सारखी करण्यासाठी चिमट्याचा उपयोग करतात.

१४) शंख- शंखास फार पुरातन काळापासून महत्व आहे. भगवान विष्णूंच्या हातातील शंख हेच दर्शवितो. भिक्षेच्या अथवा शिवाच्या दर्शनाच्या वेळी नाथपंथीय साधू शंख वाजवितात. शंखनाद हा ओंकाराचा प्रतिक मानला आहे.

१५) खापडी (खापरी)- नाथपंथी साधू फुटक्या मडक्याच्या तुकड्यावर भिक्षा घेतात. हा तुकडा म्हणजेच खापडी किंवा खापरी. कधी खापरी नारळाच्या कवटीची अथवा कांशाची बनवितात.

१६) अधारी- लाकडी दांडक्याला खालीवर पाटासारख्या फळ्या बसवून हे एक आसनपीठ तयार केलेले असते. कोठेही बसण्यासाठी योगी याचा उपयोग करतात.

१७) किंगारी- हे एक सारंगीसारखे वाद्य असून भिक्षेच्या वेळी नाथपंथी याच्यावर नवनाथांची गाणी म्हणतात.

१८) धंधारी- हे एक लोखंडी वा लाकडी पटट्यांचे चक्र असून त्याच्या छीद्रातून मालाकार असा मंत्रयुक्त दोरा ओवलेला असतो. याचा गुंता सोडविणे अतिशय अवघड असल्याने त्याला "गोरखधंधा" असेही नांव आहे. गुरूकृपेने हा गुंता सुटला तर संसारचक्रातून सुटका होईल अशी कल्पना आहे.

१९) कर्णकुंडले - जो कानफाट्या नावाचा संबंध नाथपंथाशी आहे. तो कानांस छिद्रे पाडून त्यात कुंडले अडकवितात. कुंडल धातुचे किंवा हरणाच्या शिंगाचे किंवा सुवर्ण गुंफित असते.

शनिवार, ८ मे, २०२१

राधेय - केशवसुत*

 ( आपल्या परिवारातील पाचोरा स्थित मेव्हणे आबासाहेब यांचे गुरुवार दिनांक 8 एप्रिल 2021 रोजी सकाळी 5 वाजता कोरोनाच्या आजारामुळे दुःखद निधन झाले.   अत्यंत दुःखदायक वृत्त पण ताई सुद्धा या आजाराने त्रस्त असल्यामुळे आपल्या सर्वांस कर्णोपकर्णी हे वृत्त समजले. त्यांच्या छोट्याश्या आठवणी लघुरुपात देत आहे.) 



*राधेय - केशवसुत* 

*एक आसामी,  एक रूबाबदार, एक मिश्किल,  भारदस्त आवाज,  साजेशी उंची,  टपोरे अन बोलके डोळे. भाषेवर प्रभुत्व आणि भविष्याची जाणीव करून देण्याच्या दृष्टीने साजेशा असलेला स्वभाव म्हणुनच की काय आयुर्विमा महामंडळात विकास अधिकारी म्हणुन काम, पण तेही करताना अभिकर्त्यास, शिस्त आणि जबाबदारीचे भान ठेवून उत्पन्न मिळवून देण्याचे कार्य*. 


*विवाहोत्तर पावणेतीन तपाच्या (तीन दशके अधिक) कालखंडात महामंडळातील नियोजनबद्ध कार्याचे ठसे, दोन्ही सुतांच्या विवाहोत्तर सांसारिक आणि पारमार्थिक जगण्यातही जबाबदारीने उमटविलेत.  केशवसुत आणि राधेय पुत्र म्हणुन सार्थ अभिमान होता*. 


*आप्तस्वकीयांतील उपस्थिती आल्हाददायक असायची.  आदरयुक्त भाव , जिव्हाळा आणि नम्र विनोदी स्वभावाने अल्प काळातील भेट हि स्मरणीय ठरायची.  आदरातिथ्यशील स्वभावामुळे सगळ्यांना आपलेसे वाटत. एखाद्या गोष्टीतील त्यांचे हास्य बरेच काही सांगून जाई.* 


*व्यावहारिक,  प्रापंचिक,  पारमार्थिक आणि सामाजिक या सर्व बाबतीत उच्च पातळीवर कार्यरत असताना, गत वर्षभर अत्यंत घातक अशा विषाणू पासून स्व आणि कुटुंबाचे रक्षण करीत असतानाच अत्यंत क्रूरतेने, या   दाम्पत्यावर विषाणूने जीवघेणा हल्ला केला. अर्धांगिनी हि रूग्णालयात कडवी झुंज देत, यातून बाहेर येत होती.  आणि क्षणात कोणतीही आणि कुणालाही पूर्वसूचना न देता या जगाचा निरोप घेण्यास यांना भाग पडले.  एक धगधगता यज्ञ अचानकपणे कुणीतरी येऊन विझवावा अशी कृती झाली.  जाणे एवढे धक्कादायक आणि अकस्मात होते की,  अर्धांगिनीस याची कल्पना तरी कशी द्यावी,  नियती अत्यंत क्रूर पणे दोन्ही बालकांची परीक्षा पहात होती.*


*निर्माण झालेली पोकळी कशी भरून निघणार,  पुन्हा होणार्‍या अल्पशा भेटीत, बोलके डोळे आणि खुलून टाकणारे हास्य असणार का? या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी असणार आहेत,  हे ठावूक आहे,  पण मन यातून बाहेर येण्यास आणि सत्य स्विकारण्यास राजी नाही.* *साश्रू नयनांनी आदरांजली*. 

                       ---------

कोरोना काळातील आचार संहिता

 *वाणी समाज कोरोना काळातील आचार संहिता आणि उपाय योजना*


गेल्या २२ मार्च २०२० लॉक डाऊन  पासूनच्या काळापासून सामाजिक जाणीवांमध्ये पुन्हा पुन्हा त्याच चुका होत आहेत . त्याची काही ठळक कारणे : 

१) लग्न जमविण्याचा काळ साधारणपणे मार्च  ते मे  जून  असा असतो , गेल्या वर्षी संपूर्ण भारतभर लॉक डाउन असताना , आपल्या तिन्ही जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे सुरक्षेचे नियम न पाळता साखरपुडा, लाल गंध, शिष्टाचार , लग्न, लग्नानंतर विधी  अगदी हनिमून , परदेश दौरे सुद्धा असे कार्यक्रम बिनदिक्कत पणे होत राहिलेत . याचा परिणाम साधारणपणे, मे , जून  २०२० च्या महिन्यानंतर  तिन्ही जिल्ह्यासह मुंबई पुणे बांधवांमध्ये झाला आणि  हॉस्पिटलायझेशन , होम कोरंटाईन चे प्रमाण वाढू लागले.  


२)  लॉक डाऊन काळात सर्वच नोकरी , व्यवसायावर बंधने होती / आहेत . परंतु आपल्या  बांधवांचा सरासरी फार्मसी चा व्यवसाय किंवा शासकीय हॉस्पिटल मध्ये नोकरी , त्या करणे अत्यावश्यक सेवेत यांचे कार्य रात्रंदिवस सुरु  दुसरा व्यवसाय किराणा दुकान, हे हि  अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे निम्म्याच्यावर बांधव या सेवेत गुंतल्यामुळे संसर्गाचा धोका अधिकच जाणवत आहे .  


३) या व्यतिरिक्त दिवाळी नंतरच्या कालावधीत पुन्हा एकदा लग्न समारंभ धूम धडाक्यात झालेत .  गावातील , शहरातील एकमेकांच्या घरी जाणे , छोटे छोटे कार्यक्रम करणे असेही सुरु होते .  तसेच जानेवारी  ते  मार्च च्या  दरम्यान डिस्कॉउंटेड सहलींना  जाण्याने संसर्ग वाढत राहिला .  अंत्ययात्रांनाही गर्दी जमू लागली . दिवस कार्येही झालीत.  त्याचे परिणाम हळू हळू जाणवू लागले. 


४)  याचे परिणाम वाढू लागल्यानंतर जून २०२० पासून मृत्यूचे प्रमाण दिसू लागले , सुरवातीस दिवसास एक प्रमाण असलेला मृत्यू दर दिवसाला चार , पाच कधी कधी सहा पर्यंत पोहोचला.  पण यातही सुरक्षेचे सर्व नियम टाळून हॉस्पिटलात जाऊन रुग्णाची चौकशी , मृत्यू नंतर अंत्ययात्रेत सहभाग , द्वार दर्शनासाठी जाणे आणि दिवस कार्यांचे आयोजन, या सर्व  गरबडीत संसर्गाचे प्रमाण वाढत गेले आणि  हॉस्पिटलायझेशन , होम कोरंटाईन, मृत्यू दराचा आलेख वाढतच राहिला .  या ४२५ दिवसात एकूण  ११०० ते ११५० आसपास  मृत्यू झालेले आहेत . यातील स्त्री /पुरुष  प्रमाण , वयोमानाचे प्रमाण , मिळालेले उपचार किंवा उपचारा अभावी मृत्यू, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक याचे अजून ठळकपणे विश्लेषण झालेले नाही, जे सामाजिक अभ्यासासाठी आवश्यक आहे . 

कोरोना काळात किंवा या पुढील काळात वाणी समाजाने काही नियम स्वतः साठी आणि आप्त स्वकीयांसाठी घालून द्यावे लागणार आहेत . 


१) सर्वात महत्वाचे लसीकरण , स्वतःचे , कुटुंबाचे , नातेवाईकांचे संपूर्ण समाजाचे.

२) विनाशुल्क, शुल्क, लसीकरण केंद्रासाठी मार्गदर्शन करणे , नोंदणी साठी आग्रही राहणे.

३) रोगप्रतिकारक औषधे आणि इंजेक्शनचा साठा / उपलब्ध ठेवणे 

४) आय सी यु केअर फॅसिलिटी, व्हेंटिलेटर , ऑक्सिजन व्यवस्था पाहणे 

५) सुरक्षित अंतर , मास्क , सॅनिटायझशन म्हणजेच वैद्यकीय प्रोटोकॉलची खबरदारी घेणे 

आणि

६) नातेवाईक, आप्तेष्ट यांना सर्वतोपरी सर्व नियमांचे पालन करूनच सहकार्य करा, त्यासाठी आवश्यक असेल तरच प्रवास करा, एकाच भेटीत, एकाच वेळेत शक्य असलेली सर्व कार्ये उरकून घ्या.

७) आप्तेष्टांचा मृत्यू झाल्यास, अमरधाममध्ये जाताना खूप काळजी घ्यावी, शक्यतो या कार्यात सहभागी होणाऱ्यांकडूनच कार्ये करून घ्यावीत, फुकाचा आत्मविश्वास दाखवून काही होत नाही म्हणुन अंतिम कार्ये म्हणुन स्वतःवर आणि उर्वरित कुटुंबावर संकट ओढवून घेऊ नका. सारी सरकवणे, अस्थी विसर्जन, दशक्रिया , गंधमुक्त आदी कार्यक्रम शक्यतो लांबणीवर टाकावेत आणि सर्व वातावरण निवळल्यावर करावेत, कोणत्याही नातेवाईकाचा, आप्तेष्टांचा विरोध असेल तर तो दुर्लक्षित करावा.



या साठी आर्थिक दुर्बल घटकांसाठी निधीची गरज / निकड भासल्यास तातडीची उपाययोजना 

१) साधारणतः एक कोविड पेशंट - ७ दिवस ऍडमिशन - अंदाजे खर्च रु २.७५ ते ३ लक्ष 

२) महिना भरात कमीत कमी ४ पेशंट गृहीत - रु .  १० लक्ष 

यावर  उपाय 

उपचारांसाठी नाशिक मध्यवर्ती स्थान ( हॉस्पिटल असल्यास प्राधान्य) निवडले जावे आणि त्या साठी , १) दोन फिजिशियन ची  नेमणूक केली असता , त्यांचा अंदाजे मासिक खर्च रु . ४ लक्ष   

२) स्वतः समाजाने प्राथमिक उपचार खर्चासाठी oxygen concentrator machine खरेदीचा प्रस्ताव ठेवला तर , कमीत कमी २५ मशिन्स रु . १२. ५० लक्ष (एकदाच ) 

३) औषधे आणि इंजेक्शन उपलब्धता अंदाजे खर्च रु. २ लक्ष  महिना 

४) अँब्युलन्स प्रवास खर्च रु . १ लक्ष 

५) लसीकरणासाठी (आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचे) अंदाजे २५००० पुरुष/स्त्री - खर्च रु. ७.५० लक्ष 

६) कोरोना काळात अर्थाजन करणारे घटकांचे निधन झाल्यामुळे तातडीचे आर्थिक सहाय्य्य रु. १ लक्ष प्रत्येकी , अंदाजे रू. २० लक्ष 

अशा प्रकारे 

रु.,४ लक्ष  + रु . १२. ५० लक्ष  + रु . २ लक्ष + रु. १ लक्ष +  रु.  ७. ५० लक्ष + रु . २० लक्ष  = एकूण  रु. ५० लक्ष अंदाजे 

आथिर्क तरतूद  : 

रु. १०००/- प्रत्येकी या प्रमाणे ५००० समाज बांधवांकडून एका वेळेस जमा आवश्यक , अथवा कायम स्वरूपी रु. १००००/- प्रत्येकी ५००० समाज बांधवांकडून रु. ५ कोटी जमा करणे आवश्यक . 


या साठी प्रत्येक गावातून २ प्रतिनिधी , तालुक्यातून २ प्रतिनिधी , जिल्ह्यातून ३ प्रतिनिघी या प्रमाणे एका जिल्ह्याची १५ जणांची कोअर कमिटी , तसेच ६ जिल्ह्यांची ६० जणांची कोअर कमिटी काम करेल .  

विजयकुमार वाणी
07052021.
-------